मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला. अमरावती येथे झालेल्या हिंसेत भाजपचाच हात असल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांना अटक झाल्याचं मलिक यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाने खळबळ उडाली आहे.
त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. मात्र त्याला हिंसक वळण लागलं होतं. यावरून मलिक यांनी भाजपवर टीका केली. तसेच आशिष शेलार यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान काही मौलाना फिरत असतात, मात्र राज्यात दंगल घडवण्याएवढी रझा अकादमीची ताकद नसल्याचं म्हणतांना मलिक यांनी आशिष शेलार यांच्यावर हल्ला चढवला. रझा अकादमीच्या कार्यालयात बसून शेलार काय करत होते, असा सवाल मलिक यांनी केला. तसेच आपल्याकडे एक फोटो असून दंगलीतील सर्व आरोपींची चौकशी करण्यात येईल, असा इशाराही मलिक यांनी दिला.
अमरावती शहरात हिंसा घडविण्यासाठी तरुणांना पैशांचं वाटप करण्यात आलं. अनेकांना दारु पुरवली गेली. त्यानंतर दगडफेक झाली आणि अनेक दुकानं जाळण्यात आली. या दंगली घडविण्यासाठी मुंबईतून एका आमदाराने अमरावतीला पैसे पोहोचवले. हे सगळं पोलिस तपासात समोर येईलच, असंही मलिक यांनी म्हटलं.