इजिप्तमध्ये वादळ, वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे वाळूखाली, दगडाखाली लपलेली विंचू बाहेर पडत आहेत. आतापर्यंत येथील 500 हून अधिक लोकांना विंचवाने दंश केला आहे. दंशानंतर अती वेदनेने 3 लोकांचा मृत्यूसुद्धा झाल्याची बातमी समोर आली होती. अस्वान शहरात जास्त प्रमाणात घटना घडल्याची माहिती आहे. स्थानिक सरकारी वृत्तपत्रानुसार, अस्वान शहरात शनिवारी विंचू चावल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध केली. ज्यात त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा हवाला दिला. मात्र काही वेळातच आसवानचे गव्हर्नर मेजर जनरल अशरफ अतिया यांनी तीन जणांच्या मृत्यूची बातमी चुकीची असल्याचे सांगितले आहे. मात्र, विंचू चावल्याने पाचशेहून अधिक लोक आजारी पडल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
दरम्यान, शुक्रवारी 12 नोव्हेंबर 2021 रोजी, अस्वान आणि आसपासच्या भागात जोरदार वादळ आले होते. हे क्षेत्र तांबड्या समुद्राच्या पर्वतरांगांना लागून आहेत. म्हणजे काही भाग कोरडा तर काही हिरवा तर काही वाळवंट. पाऊस आणि पुरामुळे जमिनीखाली पाणी शिरलं आणि विंचू बाहेर आले. अस्वान शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. मातीच्या विटांनी बांधलेली घरे कोसळली आहेत. टीव्ही, इंटरनेट आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. या संकाटांसोबतच आता येथील नागरिकांना विंचवाची भितीही भेडसावत आहे.
– विंचू चावण्याच्या घटनांमध्ये चौपट वाढ
दरम्यान, गव्हर्नर अश्रफ म्हणाले, पावसाळ्यानंतर विंचू चावण्याच्या घटना घडत असतात, मात्र यंदा ही प्रकरणं चौपटीने वाढली आहेत. बहुतेक प्रकरणं ग्रामीण भागातून येत आहेत, जी तांबड्या समुद्राच्या आसपासची आहेत. कारण जेव्हा डोंगरावर पाण्याचा प्रवाह वेगवान असतो, तेव्हा विंचूंच्या बिळांमध्ये पाणी भरते आणि ते निवासी भागात येतात. दरम्यान, येथील नागरिकांना उघड्यावर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरांमध्येच राहा. सध्या जंगली, डोंगराळ आणि हिरव्यागार भागात जाणे टाळा. तसेच रस्ते आणि महामार्गांपासून दूर राहा. आवश्यक असल्यासच बाहेर पडा, आणि विंचवाच्या दंशापासून वाचण्यासाठी जाड शूज घाला असा सल्ला देण्यात आला आहे.