मुंबई – एसटी विलिणीकरणाचा तिढा अद्याप सुटलेला नसून या मागणीसाठी एसटी कर्मचारी 2 महिन्यांपासून संपावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे सरकारमध्ये विलनीकरण शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणात काय अडचण आहे? राज्याची तिजोरी कशासाठी आहे हे मला कळतंच नाही. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी खूप काटेकोरपणे राज्य चालवले होते. त्यामुळे आपल्याला 15 कोटींच्या वर कर्ज घ्यावे लागणार नाही. शिवाय कोविडमध्ये मोदींनी पाच टक्के आणखी वाढवून दिले आहेत, असे पाटील म्हणाले.
सभागृहामध्ये पगारवाढ देता येत नाही असे सांगितले. मग त्या तिजोरीचे करायचे काय? नाही देत जा असे म्हणून चालत नाही. गेंड्याच्या कातडीचे सरकार झाले आहे. तुम्हाला लोकांनी निवडून दिले नाही तर गोळाबेरीज करून तुम्ही निवडून आले आहात. पैसे देऊन परिक्षा होणार असतील तर त्यातून काय होणार आगामी काळात?असा घणाघातही त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, सध्या विलनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायलयाकडे आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने त्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. समितीने विलनीकरणाबाबत केलेला अभ्यास उच्च न्यायलयात सादर केला जाईल. त्यानंतर उच्च न्यायालय विलनीकरणाचा निर्णय देणार आहे.