अरुण गोखले
आपल्या संस्कृतीने आपल्याला जे काही वार्षिक सणवार, व्रतवैकल्य, उपास आणि उपासना करायला सांगितले आहेत, त्या प्रत्येकाच्या मागे कोणत्या ना कोणत्यातरी शास्त्रीय विचारांचा पूर्ण आधार आहे. आपल्याकडे सांगितलेली कोणतीही गोष्ट ही शास्त्रास सोडून नाही. तर उलट प्रत्येक गोष्टीमागे कोणताना कोणता तरी शास्त्रीय विचार हा केलेला आहेच. फक्त आपण तो जाणून घ्यायला हवे इतकेच.
भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर आपल्या चातुर्मासाच्या कालावधीत सूर्याचे परिभ्रमण दक्षिण दिशेच्या बाजूने सुरू होते. त्यामुळे दिवस पुन्हा छोटा छोटा होऊ लागलेला असतो. या कालावधीतील ऋतुमानाचा विचार केला तर साधारणपणे याच सुमारास पावसाळा सुरू होतो. त्यामुळे हवा थंड, सुगंधित आणि उत्साहवर्धक असते. या बदललेल्या ऋतुमानाचा आणि मानवी आरोग्यशास्त्राचा विचार करूनच या सुमारास काय खावे, काय खाऊ नये या संदर्भातही काही नियम घालून दिलेले आहेत. उदा., मांस-मटण न खाणे, मद्यपान न करणे, कांदा न खाणे इत्यादी.
आपल्या चातुर्मासाचे आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे महिने काही विशिष्ट देवदेवतांच्या उपासनेसाठी फार उपयुक्त असून जणू काही ते त्या त्या देवतेच्या उपासनेसाठीच राखून ठेवलेले आहेत. उदा. श्रावण हा महिना प्रामुख्याने शिवशंकरांच्या, श्री नवनाथांच्या, श्री दत्तात्रयांच्या उपासनेसाठी आहे. या महिन्यात अनेक घरांतून श्रीशिवलीलामृत, नवनाथ-भक्तिसार, श्रीमद् गुरूचरित्र, हरीविजय, भक्तिविजय यासारख्या धार्मिक ग्रंथांचे पारायणं केली जातात. ज्यांना हे शक्य नाही ती भाविक मंडळी निदान या काळात त्या त्या ग्रंथाचे कथासार तरी मोठ्या श्रद्धेने वाचतात. तसेच या कालावधीत काही खास छोटी स्तोत्रे, छोट्या पोथ्या, पारायणासाठी तयार केलेले ग्रंथाचे विशिष्ट अध्याय हे आवर्जून वाचले जातात.
पुढे येणाऱ्या भाद्रपदात श्री गणेशाची तर अश्विन महिन्यात आदिशक्तीची नवरात्र उपासना ही आवर्जून आणि श्रद्धापूर्वक घरोघरी केली जाते. या ईश्वरी उपासनेचे फलित म्हणूनच की काय, पण सर्व सामान्य जीवांच्या जीवनात ज्ञानाची, आनंदाची, सुखाची दिवाळी येते.