सिंगापूर – प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण हा जागतिक स्तरावर आता चिंतेचा विषय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एका नव्या संशोधनातील निष्कर्ष पाहता या विषयाची तीव्रता अधिकच वाढली आहे. या संशोधनाप्रमाणे प्लास्टिकच्या अतिवापरामुळे आणि पर्यावरणातील विविध घटकांमध्ये पसरलेल्या प्लास्टिकमुळे त्याचा थेट फटका मानवी शरीरालाही बसत आहे.
दर आठवड्याला किमान पाच ग्रॅम मायक्रो प्लास्टिक शरीरात साठत असल्याचा निष्कर्ष आता समोर आला आहे. सिंगापूर मधील एरलंगा विद्यापीठातील संशोधक वेरील हसन यांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्लास्टिकच्या प्रदूषणामध्ये एक नंबरवर चीन असून त्या पाठोपाठ इंडोनेशियामध्ये प्लास्टिकपासून प्रदूषण सर्वाधिक होते. समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकमुळे प्रदूषित वातावरण निर्माण होत असल्यामुळे त्याचा फटका समुद्र जिवांना विशेषता माशांनाही बसला असून या माशांच्या माध्यमातूनच मायक्रो प्लॅस्टिक मानवी शरीरामध्ये पोहोचू लागले आहे.
अशाप्रकारे मानवी शरीरामध्ये प्लास्टिकची मात्रा वाढणे धोकादायक असून त्यामुळे विविध विकारांना निमंत्रण दिले जात आहे. या संशोधकांनी केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे 2050 पर्यंत समुद्रामध्ये जेवढे प्लास्टिक मिसळले जाईल त्याचे वजन समुद्रातील एकूण माशांच्या वजनापेक्षाही जास्त असणार आहे.
मलेशियातील सायन्स युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत संशोधन केले असून मानवी शरीरातील निम्म्यापेक्षा जास्त भागांमध्ये प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाच मिलिमीटर पेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिकच्या कणांना मायक्रो प्लास्टिक मानले जाते. अशा प्रकारचे दहा ते बारा लाख कण मानवी शरीरामध्ये दर सप्ताहाला जात असावेत. पाणी पिण्यासाठी किंवा आहार घेण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या वस्तू वापरतो किंवा खाद्यवस्तूंसाठी वेस्टन म्हणून ज्या प्लास्टिकच्या गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे ही शरीरात प्लास्टिक जाऊ शकते.
प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्यात आला किंवा संपूर्णपणे बंद करण्यात आला तरच आगामी कालावधीमध्ये या समस्येवर मात करता येऊ शकेल असे तज्ञांनी सुचवले आहे