शर्मिला जगताप
“माझं काय चुकलं? हा साहेबराव पवळे यांचा तिसरा कथासंग्रह. या कथासंग्रहात गुरूदक्षिणा, मोबाइल, बाबा मला माफ करा, करोना प्रसाद, धागा सुखाचा, माझं काय चुकलं?, परतून ये पाखरा अशा एकूण 10 कथा गुंफल्या आहेत. या कथा विचार करायला भाग पाडतात. या कथांमधून नायक नायिका समस्यांतून मार्ग काढताना दिसतात. त्यामुळे कथा वाचकांना जवळच्या वाटतात.
कथा प्रामुख्याने तरुण बेरोजगारांचे प्रश्न, ज्येष्ठांच्या समस्या आणि शेतीपुढील आव्हाने अधोरेखित करते. कौटुंबिक नातेसंबंधातून आकार घेत ही कथा आपल्या प्राकृत जीवनातील अनेक प्रश्नांचे उत्तरदायित्व स्वीकारते. माणसाच्या एकारलेपणाशी ती मैत्री करते आणि कथेच्या संभ्रमित नायकाला एक शाश्वत मार्ग दाखविते. “गुरूदक्षिणा’ या पहिल्याच कथेत आपल्याला याची प्रचिती येते.
वडिलांशी संघर्ष करून घर सोडलेला मुलगा “बाबा, मला माफ करा’ या कथेत करोना संकटामुळे कसा पुन्हा आई-वडिलांशी जोडला जातो हे नाट्य वाचनीय आहे. जीवनात होणारे आघात, अपघात आणि त्यातून आयुष्याला मिळणारी कलाटणी कथेत अकल्पितपणे घडते. तरुण असो वा वृद्ध त्याच्यासाठी ही कथा “आधारवड’ ठरते. जीवनातील सहचर्याचा प्रश्न ती सहज सोडविते. माणसाने माणसाचा आधार व्हावं पण या नात्याचा परिमळ पवित्र आणि विशुद्ध असावा.
मुले परदेशात रमतात तेव्हा त्यांच्या एकाकी पालकांनी शोधलेला निरपेक्ष आधार किंवा तीव्र छळ सोसलेल्या नवपरिणीत वधूची अनासक्त तरुणाने ऐकलेली आर्त हाक या कथेतून ऐकू येते. या अगतिकतेला ही लेखणी नवा हक्क निर्माण करून देते तेव्हा एक आई निर्भीडपणे आपलं संचित वृद्धाश्रमाला दान करीत आपल्या मुलाला “माझं काय चुकलं?’ असा प्रश्न विचारते आणि वाचक अंतर्मुख होतो.
“माझं काय चुकलं?’ हा कथासंग्रह पिंगळावेळ प्रकाशन, पुणे यांच्यावतीने प्रकाशित केला आहे.
एकूण पृष्ठे – 140 मूल्य – 125 रुपये