खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल: अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ सभा
सहकारनगर –पर्वती मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आपण दहा वर्षे दिली आहेत. देश, राज्य आणि पुणे महानगरपालिकेही भाजपची सत्ता असून सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक आमदारांना आपण काय विकास केला? हे जर सांगता येत नसेल, तर पर्वती मतदारसंघात भाकरी फिरविण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत सिने अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महाआघाडीच्या उमेदवार नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, “सत्ताधारी भाजप रडीचा डाव खेळत आहे. देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये देशाचे मुद्दे मतदारांपुढे करून भावनिक राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री हे “समोर पैलवान नाही आणि कुणाचेही आव्हान नाही,’ सांगून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांतील केलेल्या कामाचा आलेख जनतेपुढे मांडावा. मॅग्नेटिक महाराष्ट्राचे काय झाले? मेक इन महाराष्ट्राचे काय झाले? किती तरुणांना रोजगार मिळाला? या प्रश्नांची उत्तरे जनता मुख्यमंत्र्यांना विचारत आहे.
पुणे शहराने भाजपला आठ आमदार दिले. तरीही पुण्याची मेट्रो नागपूरला जाते. 370 कलम पुढे करून देशाच्या मुद्द्यावर राज्याची निवडणूक लढविली जात आहे. 370 कलम रद्द झाल्यामुळे पुणे शहराची वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तरुणांना रोजगार मिळणार नाही. पर्वतीमध्ये नगरसेविका आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अश्विनी कदम यांनी केलेल्या कामांचा सर्व पर्वतीकर नागरिकांना अभिमान आहे. त्यामुळे मतदार त्यांना संधी देतील, असा विश्वासही डॉ. कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.