नवी दिल्ली – भारतीय कुस्तीगीर महासंघाविरुद्ध वरिष्ठ खेळाडूंनी आंदोलन करुन आमचे संपूर्ण वर्ष वाया घालवले. आता तरी भारतीय कुस्तीला जीवदान द्या अशी मागणी करत देशातील तब्बल तीनशेपेक्षाही जास्त कुस्तीपटूंनी जंतर मंमतरवर धरणे धरले आहे. आमच्या कारकीर्दीतील एक महत्वाचे वर्ष वाया घालवल्याबद्दल या कुस्तीपटूंनी बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांनाच दोषी ठरवले आहे. त्यामुळे कुस्ती महासंघात सुरु असलेल्या वादाला वेगळे लागले आहे.
उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली येथून जंतर मंतरवर शेकडो नवोदित कुस्तीपटू धरणे धरून बसले आहेत. केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने वरिष्ठ आंदोलक खेळाडूंवर कारवाई करावी व आम्हालाच आता न्याया द्यावा अशी मागणी केली आहे. हे सर्वजण बजरंग, विनेश, साक्षीच्या विरोधात घोषणाबाजीही करत आहेत.
सरकारने येत्या दहा दिवसांत भारतीय कुस्तीगीर महासंघावरील बंदी उठवली नाही तर आम्ही देखील मिळवलेली पदके परत करू. देशाला ज्या कुस्तीपटूंनी ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून दिली त्यांनीच आंदोलन छेडले व आता त्यांच्यापासूनच भारतीय कुस्तीला खरा धोका आहे, असेही या कुस्तीपटूंनी म्हटले आहे.
ब्रिजभूषण यांनीच भडकवले
या नवोदित कुस्तीपटूंना सरकार, केंद्रिय क्रीडा मंत्रायल व आंदोलनकर्ते कुस्तीपटूंविरोधात महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनीच भडकावले असल्याचे ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटले आहे. केंद्र सरकारने ब्रिजभूषण यांच्याबाबत कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या चौकशी व तपासाचे कामही लवकर पूर्ण करत न्यायालयात त्याची कागदपत्रेही सादर करावीत जणेकरुन सत्य समोर येइल, अशी मागणीही बजरंगने केली आहे.