नवी दिल्ली -केवळ गुणवत्ता असून चालत नाही हेच वेस्ट इंडीज संघाकडे पाहिल्यावर लक्षात येते. ज्या संघाने एकेकाळी जागतिक क्रिकेटवर राज्य केले तोच संघ यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र होऊ शकला नाही याचे वाइट वाटते.
मात्र, त्यासाठी त्यांचे खेळाडू जबाबदार नाहीत तर त्यांच्या क्रिकेट मंडळातील राजकारण जबाबदार आहे, असे परखड मत भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे.
वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंकडे नैसर्गिक खेळ आहे. त्यांचा कोणत्याही दशकातील संघ पाहा आपल्याला ते सहज लक्षात येइल. आताच्या संघातही अफाट गुणवत्ता आहे मात्र, त्यांच्या मंडळात जे राजकारण सुरू आहे त्यामुळेच आज त्यांना हा दिवस पाहावा लागला आहे. यातून काहीतरी बोध घेत त्यांचे क्रिकेट राजकारणमुक्त व्हावे हीच अपेक्षा आहे, असेही सेहवाग म्हणाला.
1997 व 1979 या सलग दोन साली वेस्ट इंडीजने विश्वकरंडक जिंकला होता. त्याच काळात त्यांनी जागतिक क्रिकेटवर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्याकडे प्रत्येक खेळाडूला तेवढाच सक्षम पर्यायही होता.
आज त्यांच्याकडे सेकंड बेंच असला तरीही तो त्या दर्जाजा नाही. मात्र, सध्याच्या संघात जे खेळाडू आहेत त्यांचीही क्षमता विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची निश्चितच होती. पुढील काळात पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करतील, अशी अपेक्षाही सेहवागने व्यक्त केली.