Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी एक वेदनादायक रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 लोक जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला. यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शनिवारी बालासोर जिल्ह्यातील अपघातस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ममता बॅनर्जी या विशेष हेलिकॉप्टरने बालासोरला रवाना होणार आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस हावडा येथील शिबपूर भागातील शालीमार स्टेशनवरून शुक्रवारी संध्याकाळी निघाली होती, त्यामुळे मृतांमध्ये काही बंगालच्या नागरिकांचाही समावेश असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार, बचाव कार्यात मदत करण्यासाठी 25 रुग्णवाहिका आणि 12 सदस्यीय वैद्यकीय पथक आधीच अपघातस्थळी पोहोचले आहे. तर पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनीही अपघातस्थळी भेट दिली. मात्र आणखी रुग्णवाहिका पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा आणि पक्षाच्या लोकसभा सदस्या सुकांता मजुमदार आधीच अपघातस्थळी पोहोचल्या आहेत.
पश्चिम बंगालचे मंत्री मानस भुनिया, तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन आणि काही अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी रात्री उशिरा रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. पश्चिम बंगाल सरकारने माहितीसाठी शुक्रवारी रात्रीपासून दोन आपत्कालीन क्रमांक 033- 22143526/22535185 जारी केले आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी देखील ओडिशातील बालासोरला जाऊन रेल्वे अपघातस्थळी भेट देणार आहेत.