शर्मिला जगताप
बदलत्या भविष्याबाबत सावध करणारं चिंतन म्हणजे सुधाकर घोडेकर यांनी लिहिलेले “पुढच्या हाका’ हे पुस्तक होय. समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, नोकऱ्यांची उपलब्धता, कृषीक्षेत्र आणि भविष्यातला धर्म या सगळ्यांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे. अतिशय सोप्या, सरळ भाषेत हा इतका मोठा विषय मांडला असल्याने वाचकांना तो भावेल.
प्रत्येक क्षेत्राची सुरुवात कशी झाली, सध्या कुठे आहे आणि भविष्यात कुठे जाण्याची शक्यता आहे याचं विचारमंथन या पुस्तकात सुलभतेने केलं आहे. इंग्रजीत ऑल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, युवाल हरारी अशा अनेक लेखकांची भविष्याचा वेध घेणारी पुस्तके आहेत. मराठीत मात्र असा वेध घेणारी पुस्तके नाहीत किंवा अपवादानेच एखादं असेल. त्यामुळे या पुस्तकाची वाचकांसाठी खरोखरच गरज होती.
प्रगत तंत्रज्ञान आपल्याला अनेक गोष्टी उपलब्ध करून देते आणि आपलं जगणं अधिक सुखद करते. मागील काही दशकांत, म्हणजे संगणकाने अधिक प्रगती केल्यानंतर आणि संगणकाची क्षमता प्रचंड वाढल्यानंतर तर तंत्रज्ञानाने प्रचंड असे बदल करायला सुरुवात केली आहे. अनेक बदल आपल्या आयुष्यात दाखलही झाले आहेत.
हे बदल इतक्या वेगात झाले आहेत की, ज्येष्ठ नागरिकांच्या एक दोन पिढ्यांना तर त्याच्याशी जुळवून घेणं अवघड, अशक्य झालं आहे. तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलांचा प्रभाव आपल्या जगण्याच्या सर्व पैलूंवर पडतो आहे. सध्या आपण जसे राहतो आहोत, जसं जीवन जगत आहोत तसंच भविष्यात असेल असं नाहीच. भविष्यात अनेक पैलूंना कसा आकार येऊ शकेल हे सांगताच येणार नाही अशी परिस्थिती आहे.
आपली कुटुंबसंस्था मोठ्या प्रमाणात बदलायला लागली आहे आणि त्यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. केवळ ज्येष्ठ नागरिकच घरात असणारी घरे आता मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहेत. अनेकांची मुले परदेशात गेल्यामुळे, काहींची राज्याबाहेर किंवा अन्य शहरात स्थायिक झाल्यामुळे किंवा अन्य कारणाने सध्या आई-वडील आणि कर्ती मुले एकत्र राहात असण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे.
पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात सुरू होत असलेले वृद्धाश्रम हे त्याचंच निदर्शक आहे. वृद्धाश्रमाचे पैसे भरले की, आपली जबाबदारी संपली असं समजणारी मुलेही सध्या पाहायला मिळतात. शिक्षणाबाबतचे बदलही आपण अनुभवतो आहोतच. भविष्यात अनेक प्रकारच्या पदव्या आणि अनेक प्रकारचे अभ्यासक्रम कालबाह्य होतील किंवा टोकाचे बदलतील.
बहुसंख्य पालक मात्र आता आहे ते शिक्षण भविष्यात उपयोगी पडेल असं समजून गाफील आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यामुळे तर अनेक ठिकाणी माणसांची आवश्यकताच उरणार नाही किंवा फार कमी लोकांची गरज उरलेली असेल.
वैद्यकीय क्षेत्रही प्रचंड बदलेल अशी चिन्हे आहेत. आताच आपण टेलिमेडिसीनवर आलेलो आहोत. कोविडच्या काळात आपण फोनवरून डॉक्टरांकडून औषधे लिहून घेतली होती. ते काम आता एक संगणकीय आल्गोरिदम करेल. तुमच्या आरोग्याचा तपशील एकदा नोंदला गेलेला असला की मग कोणत्याही ठिकाणी असा तुम्हाला डिजिटल माध्यमाद्वारे उपचार
मिळायला लागतील. अशा अनेक भविष्यातील बदलांचा वेध या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.
विश्वकर्मा प्रकाशनाने (पुणे) हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 238 पाने असलेल्या या पुस्तकाचे मूल्य 320 रुपये असून प्रत्येकाने वाचावं असं हे विचारमंथन आहे.