– प्रतिनिधी
डॉ. कुंडलिक केदारी हे एक साहित्यिक, नाटककार म्हणून नावाजलेले आहेत. विविध विषयांवरची नाटके त्यांनी स्वत: बसवून घेतली व रंगमंचावरून वेळोवेळी नाट्यरसिकांपुढे सादर करण्याचे धाडस केले. “उगवती संध्याकाळ’ हे त्यांचे एक नाटक. आई, वडील, मुलगा, सून आणि त्या कुटुंबाचा निःस्वार्थ स्नेही या नाते संबंधातील स्वार्थी, नि:स्वार्थी भावभावनांचे पदर त्यांच्या “उगवती संध्याकाळ’ या नाटकामधून त्यांनी उलगडून दाखविले आहेत. त्यासाठी नाट्यमय प्रसंगांची निर्मिती त्यांच्या हातून झाल्याचे जाणवते. या नाटकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक आणि विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांची वेचक प्रस्तावना लाभली आहे.
अतिशय सुटसुटीत, नेमकी भावना व्यक्त करणारी संवादशैली हे या नाटकाचे वैशिष्ट्य. घरगुती कौटुंबिक प्रसंगांचे चित्रण करणारे नाटक लिहिताना नाटककाराने रंगमंचावरील अवकाशाचे, प्रकाशयोजनेचे, नाटकातील प्रत्येक पत्राच्या रंगमंचावरील हालचालींचे यथायोग्य भान ठेवले आहे. कौटुंबिक सर्वश्रुत अनुभव असल्याने लेखनात आणि भविष्यातील सादरीकरणात कुठेही अतिरेक केलेला दिसत नाही. सावित्री आणि भाऊराव यांच्या प्रखर जीवननिष्ठेची, संसाराच्या सायंपर्वातसुद्धा जगण्याची जिद्द टिकवून ठेवण्यासाठी संघर्षशक्तीचा, कठोर निर्णय शक्तीचा ठामपणे “नाही’ म्हणण्याचा करून घेतलेला वापर, हे या नाटकाचे मध्यवर्ती सूत्र आहे.
वेगळे राहायचे मनात ठरवूनच ठेवलेली व त्यानुसार पती, सासू, सासरे यांच्याशी वागणारी, नोकरी करणारी संगीता ही सून आणि केवळ पत्नीच आहे म्हणून तिच्या शब्दासाठी तिच्या इच्छेपुढे सतत मान तुकविणारा तिचा नवरा सागर या दोघातले वैचारिक द्वंद्व नाटककाराने अचूक पकडले आहे. म्हणजे एकाच वेळेला दोन पिढ्यातील नातेसंबंध, स्वप्ने, इच्छा, जगण्यातील वास्तव हे नाटकातून टिपताना या निष्ठुर प्रसंगांवर आपल्या नि:स्वार्थ सल्ल्यांचे शिंपडणं करणारा भौरावांचा घनिष्ट कुटुंबमित्र दामू अशी काही प्रसंगनिष्ठ ठळक पात्रे या नाटकातून आपल्यासमोर उभी करण्यात नाटककाराचा हातखंडा असल्याचे जाणवते.
साधारणत: 60/70 च्या दशकातील “सावित्री’ ही परिस्थिती शरण स्त्री नाटककार डॉ. केदारींनी उत्तम पद्धतीने उभी केली आहे. एखाद्या नाटककाराला आपल्या नाटकाची निर्मिती करताना सामाजिक संदर्भाचा किती अभ्यास, निरीक्षणातून करावा लागतो त्याचे उदाहरण म्हणजे “उगवती संध्याकाळ’ हे डॉ. केदारींचे नाटक आहे.