सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे .जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अवकाळी पावसामुळे घरावरचे पत्रे उडून जाणे, गोठ्याची मोडतोड होणे, झाडे उन्मळून पडणे, पिकाची नासाडी होणे असे विविध नुकसान झाले आहे.
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तालुकानिहाय तातडीने पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख सागर रायते, सुनील पवार, रमेश बोराटे, उपजिल्हा संघटक सादिक बागवान, तालुका समन्वयक हरिदास पवार ,सुनील मोहिते, शहर प्रमुख रविंद्र भणगे उप तालुकाप्रमुख आकाश दौंडे इत्यादी यावेळी उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे विविध ठिकाणी सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे .रस्त्यावरची मोठी झाडे उखडून पडल्याने वाहतुकीची समस्या तसेच खंडित विद्युत पुरवठा असे मोठे नुकसान झाले आहे.
उन्हाळ्याच्या त्रासासोबत पिण्याच्या व वापराच्या पाण्याची सुद्धा तीव्र टंचाई भासत आहे शासन स्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे