मुंबई/ औरंगाबाद – शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी बनवलेल्या “टूलकिट’ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक वॉरंट जारी केलेल्या निकिता जेकबच्या प्रवासी अटकपूर्व जामिनावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने उद्यापर्यंत (बुधवार) राखून ठेवला. तर तशाच स्वरूपाचा बीड येथील मूळचा आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असणारा शंतनू मुळूक याचा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केलेला अर्ज मंजूर केला. त्याला संबंधित न्यायालयात अर्ज करण्यासाठी 10 दिवसांचा प्रवासी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी दिशा रवीसह मिळून खलिस्तानवादी गटांच्या सहकार्याने टुलकिट तयार केले. त्यांनी ते स्विडीश पर्यावारणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गपर्यंत पोहोचवले. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईत सुधारणा करण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करण्यासाठी अंतरिम संरक्षण मागणारी याचिका दाखल केली. तिने म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या पथक आणि त्यांच्यासोबत वनराई पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी 12 फेब्रुवारीला येऊन गेले होते. त्यांनी माझी काही कागदपत्रे तसेच काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केली होती.
जेकबची याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल केली होती. तर बिडचा मुळचा रहिवासी असणाऱ्या मुळूकने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. दोन्ही याचिकांमंध्ये दिल्लीतील न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवड्याचे अंतरिम संरक्षण देण्याची मागणी केली. भारतीय घटनेने दिलेल्या हक्कानुसार आणि तत्वानुसार वागणाऱ्या व्यक्तीच्या घरापर्यंत राजकारणातून शत्रूत्व काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे मुळूकच्या अर्जात म्हटले आहे.