तळेगाव दाभाडे -मागील दोन वर्षांपासून लग्नसराईच्या कार्यक्रमांवर करोनामुळे अनेक निर्बंध लावले होते. यामुळे अनेकांनी धूमधडाक्यात होणारे लग्न उत्सव अगदी साध्या पद्धतीने आटोपले. आता करोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे पुन्हा लग्नसराईची धूम पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यातील मंगल कार्यालये व सभागृहांची आगाऊ नोंदणी केली जात आहे. यामुळे लग्नसराईत चालणाऱ्या व्यवसायांना पुन्हा चालना मिळाली आहे.
करोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले होते. त्यामुळे अनेकांनी लग्नाचे बेत पुढे ढकलले होते. पण करोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे लग्न समारंभांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. एप्रिल, मे, जून, जुलै महिन्यापर्यंत लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेकांनी यंदा कर्तव्य उरकण्याचे मनावर घेतले आहे. लग्न समारंभाला जोडून असलेल्या विविध उद्योगांना करोनाकाळात उपासमारीची वेळ आली होती. त्यात कारागीर वर्ग पुरता भरडला होता. पण आता पुन्हा लग्नाचे कार्यक्रम आखले जात असताना त्यांना नवी उभारी आली आहे. या वर्षी त्यांना मे महिन्यापर्यंत आगावू नोंदणी आली आहे. तसेच केटरींग व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे.
एप्रिलमध्ये 12 मुहूर्त
गुरूचा अस्त असल्याने मार्च महिन्यात केवळ चार मुहूर्त होते. या वर्षी एप्रिल महिन्यात 12 मुहूर्त आहेत, तर मे महिन्यात सर्वाधिक 13 मुहूर्त आहेत, जून महिन्यात 12 तर जुलै महिन्यात पाच मुहूर्त आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिकांच्या अर्थचक्राला मोठी चालना मिळणार आहे. लग्नसराई सुरू झाल्यामुळे व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.