आरोग्यमंत्री टोपे : गव्हर्निंग बॉडी तसेच टास्क फोर्सची बैठक
पुणे – “हवामानातील बदलांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे सिद्ध झालेले आहे. या नकारात्मक बदलांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची तसेच महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केले.
हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय गव्हर्निंग बॉडी तसेच टास्क फोर्सची बैठक टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आरोग्य अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. साधना तायडे, संचालक डॉ. दीपक म्हैसेकर, हवामान खात्याचे पुणे विभाग प्रमुख डॉ. होसोलीकर आदी अधिकारी उपस्थित होते.
“क्लायमेट चेंज’ आणि “ग्लोबल वॉर्मिग’च्या प्रक्रियेस खीळ घातली नाही तर ही पृथ्वी सजीवांना राहण्यायोग्य राहणार नाही. या सर्व समस्याना नेमका प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य हा कार्यक्रम सुरू केला आहे. यासाठी राज्य गव्हर्निंग बॉडी आणि टास्क फोर्सची ही बैठक घेण्यात आली.
कार्यक्रमाचे राज्य नोडल अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य संदर्भातील सादरीकरण केले. या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राज्यात पर्यावरणीय आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आला असून, उष्णतेमुळे होणारे विकार तसेच सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये श्वसन संसर्गाचे सर्वेक्षण करण्यात येते आहे.