मुंबई – ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयाला उद्याच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार अल्पमतात असताना ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णय घेतला. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय बेकायदेशीर असतात. आम्ही उद्या सकाळी कॅबिनेट घेऊन संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाला शिक्कामोर्तब करणार आहोत.
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही संयम बाळगत होतो, इकडे चर्चा करायची आणि तिकडे पदावरून काढायचे. माझ्या घरावर दगडफेक करण्यास सांगितले, पण वेळ आली तेव्हा सगळे मागे आले. एकनाथ शिंदेंना तुम्ही हलका समजला का? लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते. एकीकडे चर्चा करायला पाठवायचे आणि दुसरीकडे कारवाई करायची. मधमाशासारख पोळ माझ्याबाजूने आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर आम्ही कमी केले, कारण हे सर्वसामान्यचा सरकार आहे. हा मुख्यमंत्री माझा आहे असं वाटलं पाहिजे. लोक म्हणताय मंत्रालय सुरू नाही, अरे मी जिथे जातो तिथे मंत्रालय आहे, जिथे जातो तिथे माझं काम सुरू असते, काम सुरूच आहे. ज्यांना चर्चा करण्याच्या आहेत त्या करू द्या. सकाळी 7 पासून पूरस्थितीचा आढावा घेत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.