पुणे – ‘महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये चाललेत आणि गुजरातमधील ड्रग्ज महाराष्ट्रात आणले जात आहे. त्यामुळे राज्यातील तरूण पिढी बरबाद करण्याचे काम गुजरातची लॉबी करीत आहे. ही लाॅबी आम्ही मोडून काढू, असे खासदार संजय राऊत यांनी सांगत सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल चढविला. यापुढचा खासदार भाजपचा होउ देणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित शिवसेना मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील ‘तिघाडी’ सरकारचा खरपूस समाचार घेतला. उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, रघुनाथ कुचिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या जल्लोषाला उद्देशून राऊत म्हणाले, ‘शिल्लक सेना काय आहे, हे देवेंद्र फडणवीस तुम्ही येथे येऊन पाहा. तुमच्याकडे फक्त कचराच आला आहे लक्षात घ्या. २०२४ नंतर तुम्ही शिल्लक राहणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी दिसतायेत ही शिवसेनाप्रमुखांची कृपा आहे, याची आठवण करून दिली. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कुठे मोदी लाट दिसली नाही. त्यामुळे या देशातील फक्त एक निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. मग जे चित्र असेल ते संपूर्ण देश स्वीकारायला तयार आहे. हवं तर पुण्याची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले. सुषमा अंधारे म्हणाल्या, आज अटलबिहारी वाजपेयीची भाजप राहिली नाही.
मुख्यमंत्रीपदाच्या अतिमहत्त्वाकांक्षेपोटी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकार अस्थिर ठेवले. अधिवेशनात शेतकरी, मराठा, धनगर आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी नवाब मलिक यांचा मुद्दा समोर आणला. ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर यांना अटक कधी होणार? असा प्रश्न उपस्थिता केला.
पुण्याच्या लोकसभेवर शिवसेनेचा दावा…
पुणे लोकसभेची जागा ही शिवसेनेनी लढवली पाहिजे. तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे. शिवसैनिक एकजुटीने काम करेल, असा विश्वास माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केला. त्याला सचिन अहिर यांनी दुजोरा देत नक्कीच आपण लोकसभेची जागा लढवली पाहिजे. त्यावर संजय राऊत यांनीही होकार देत पुण्यातील शिवसेना मजबूत आहे. आगामी विधानसभेत शिवसेनेचे किमान तीन आमदार विधानसभेत जातील. आणि लोकसभेचा खासदार हा भाजपचा नसेल ही आमची गॅरंटी आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.