पिंपरी – तळवडे येथील कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ महिलांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या एक पुरुष व सात महिलांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून या महिलांच्या मृत्यूला जबाबदार कोण? फायर ऑडिट न केलेली महापालिका की अनाधिकृत शेडला संरक्षण देणारा अतिक्रमण विभाग की शेड भाड्याने घेणारे आणि देणारे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर या घटनेनंतर खूपच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या स्पार्कल मेणबत्ती कारखान्यात तीनशे रूपये रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. या महिलांच्या मृत्यूमुळे त्यांचा परिवार पोरका झाला असून चिमुरडे अजूनही रूग्णालयातून आपली आई उपचार घेऊन येणार आहे. याच आशेवर आहेत. म्हणून ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे.
याबाबत योगेश तपस्वी म्हणाले, सर्वच अनधिकृत असल्यास महापालिकाची जवाबदारी येते का? आम्ही उद्योगाची नोंदणी करणार नाही, आम्ही प्रॉपर्टी शुल्क भरणार नाही, आम्ही भाडे करार करणार नाही, आम्ही कामगार नोंदणी करणार नाही, कामगारांचा ईएसआय, पीएफ भरणार नाही, त्यांचे इन्शुरन्स काढणार नाही. पण जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशातून फायर ऑडिट करावे, रस्ते बांधावे, आग लागल्यास बंब पाठवावा. अशीच अनेकांची मानसिकता दिसते.
यल्लापा वालडोर म्हणाले की, आगीची घटना घडल्यास जळीत व्यक्तीला लवकर उपचार मिळावे, यासाठी वायसीएम रूग्णालयात बर्न वॉर्ड तयार करण्यात यावा. यासंदर्भात आपच्या वतीने 9 डिसेंबर 2022 रोजी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. मात्र, त्याची दखल घेतली नाही.
प्रमोद पवार म्हणाले की, तळवडे परिसरात असे अंसख्य धोकादायक वर्कशॉप आहेत. जिथे केव्हाही दुर्घटना होऊ शकते.
नागरिक म्हणातात
या घटनेत जागामालक जास्त दोषी आहे. स्थानिक असल्याने प्रत्येक ठिकाणी वशिला, ओळख काढतात. बाहेरील कामगार ह्या साठीच पाहिजेत, की ते मेले तरी त्यांना कोणी वाली नसते.
-राहुल परानकर
या शहराचे नागरिक आणि लोकप्रतिनिधी जे निमूटपणे सगळं पाहत आहेत. बिनकामाच्या दिखाऊ वेगवेगळ्या सर्वेक्षणमध्ये वेळ घालवण्यापेक्षा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वर जनतेने बोलले पाहिजे.
– गणेश बोरा
चंगळवाद वाढला की अशा गोष्टी होतच राहणार. जे खपते ते बनवलं जाणार, विकले जाणार, अशा गोष्टीकडे रोजगार निर्मिती म्हणून पाहिलं जात आहे. हे दुर्दैव आहे.
– सिकंदर घोडके
तळवडे आग प्रकरणातील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना 10 लाखांची मदत देणे गरजेचे आहे.
– छाया जगदाळे