पुणे- बी.जे.एस. कॉलेज येथे शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या केंद्रावर लसींचा साठा कमी पडू देणार नाही. जो पर्यंत वाघोलीतील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होत नाही तो पर्यंत सदर केंद्र सुरू ठेवू, अशी ग्वाही शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी (दि.27 जुलै) येथे स्व:खर्चातून कटके यांनी सुरू केलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रातील लसीकरणाचा आकडा पाच हजारापर्यंत पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर येथील नियोजनाची पाहणी स्वत: ज्ञानेश्वर कटके यांनी केली.
यावेळी त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी लसीकरण केंद्रात उपस्थित राहून लसीकरण मोहिमेत सहभागी होत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची आपुलकीने विचारपूस केली. केंद्रात करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावाही त्यांनी घेतला.
संपूर्ण वाघोली परिसर आपल्याला करोनामुक्त करायचा आहे, जे नागरिक अद्यापही लसीकरणापासून वंचित राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर माझ्या जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करावी. जास्तीत जास्त नारिकांनी लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा, असे अवाहनही कटके यांनी यावेळी केले.
सुसज्ज यंत्रणा हेच मोहिमेचे श्रेय
शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या लसीकरण केंद्रातील सुयोग्य नियोजन तसेच यंत्रणा यामुळेच पाच हजार लसीकरणाच्या जवळ पोहचण्यामागील श्रेय असल्याचे आयोजकांनी सांगितले. डॉक्टर, परिचारिका तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी या कामी कटके हे स्वत: सातत्याने संपर्क ठेवून आहेत.
लसीकरणाची नोंदणी ते कंपन्यांशी चर्चा करून लस उपलब्ध करणे, लससाठा तांत्रिक पद्धतीने साठवणूक तसेच आरोग्य कर्मचारी, शिवसैनिक यांच्याशी सातत्याने संवाद ठेवून कटके यांनी घेतलेला सहक्रीय सहभाग हे या मोहिमेच्या यशाची वैशिष्ठ्य ठरली आहेत.