पुणे – केंद्र शासनाने समान नागरी कायद्याच्या आधी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे विधीमंडळ व संसदेत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. महिला आरक्षणाबाबतच्या धोरणाला राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्ष पाठींबा देतील, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याबाबत मतं मांडली. विधी आयोगाकडे या विषय सोपविण्यात आला. विधी आयोगाकडे 900 सूचनांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. या सूचनांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस भूमिका नंतर जाहीर करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्या-राज्यात वाद निर्माण करत आहे. केंद्रातील सर्व विरोधी पक्षांची 13, 14 जुलै रोजी बंगळुरू येथे बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येणार आहे.
नागरिकांच्या मनात केंद्रातील भाजप सरकारविषयी नाराजी आहे. भाजपला पूर्वी सत्ता असलेल्या काही राज्यात पुन्हा सत्ता मिळविता आलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागेल, याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान मोदी त्यांच्या पदाला शोभणार नाही, अशी वक्तव्ये करत आहेत, अशी टीकाही यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
मोदींचे वक्तव्य अशोभनीय
पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मत द्या, असा टोला लगावला होता. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, मोदींना असे वक्तव्य करणे शोभत नाही. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असे मत व्यक्त करणे योग्य नाही. संसदेतील कामगिरीत सुप्रिया सुळेंनी 98 टक्के हजेरी लावली व अधिकाधिक सहभाग नोंदवला. त्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे. संसदेच्या कामाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने सुप्रिया सुळेंना आठ वेळा पुरस्कार दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी काहीही सांगितले तरी स्वतःच कर्तृत्व असल्याशिवाय या देशातील मतदार मत देत नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.