पुणे – सदाशिव पेठेत मंगळवारी २७ जून रोजी एका विद्यार्थिनीवर तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र वेळीच तेथील तरुणांनी प्रसंगवधान दाखवत त्या मुलीचे प्राण वाचवले. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील असे या दोन तरुणांचे नाव आहे. सध्या राज्यभरातून या दोघांचे कौतुक केले जात आहे. अशात ही घटना समोर येताच, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या मुलांसाठी ५१ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. त्यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी या तिघांचीही काल (२९ जून) भेट घेतली. भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी एक मुद्दा अधोरेखित केला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी काल या या तरुणांची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी ट्विट केले आहे,’“पुण्यात माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात,एका तरुणीचा जीव वाचणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांना आज भेटलो. लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी या तीन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला. इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे”, असं ट्वीट आव्हाडांनी केलं आहे.
काय घडलं होत नेमकं त्यावेळी
आरोपी शंतनु जाधव तरुणीवर कोयत्याने वार करत असतानाच लेशपालने त्याला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर मागून आलेल्या हर्षद पाटील याने आरोपीच्या हातातील कोयता खेचून घेतला. त्यांच्या मदतीला सतीश नेहूल आणि इतर विद्यार्थी धावले. काही नागरिक आणि तरुणांनीही धाव घेत शंतनूला मिळेल त्या वस्तूने मारण्यास सुरुवात केली. नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शंतनूला घेराव घालून वाचवले. त्याला पकडून शेजारील पेरुगेट पोलीस चौकीत नेले.