कोलकाता – भारतीय संघाचा संयमी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याच्याबाबतचे वाद काही केल्या संपुष्टात येत नसल्याचेच दिसत आहे. बंगाल क्रिकेट संघटनेने अपमानित केल्यामुळे हा शांत खेळाडूदेखील संतापला असून, देशांतर्गत स्पर्धेतील सर्वात मानाची मानली जात असलेली रणजी करंडक स्पर्धेची बाद फेरी पश्चिम बंगाल संघाकडून खेळणार नसल्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे साहा याने सांगितले आहे.
त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्येही केली होती. तसेच क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांनी मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप साहाने केला होता. त्याच्या आरोपात तथ्य आढळून आल्यावर मुजुमदार यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदीही लावली. हे सर्व कुठे शांत होत असताना पुन्हा एकदा बंगाल संघटना व साहा यांच्यातील वाद उफाळून आला.
यंदाची आयपीएल स्पर्धा रविवारी संपल्यानंतर आता सुरू होणाऱ्या रणजी करंडक बाद फेरीतील सामन्यांपूर्वीच त्याने बंगालचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच तो संघाच्या व्हॉट्सऍप ग्रुपमधूनही बाहेर पडला आहे.
बंगाल संघटनेचे सहसचिव देवव्रत दास यांनी आपल्याला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगत साहाने हा निर्णय घेतल्याचे मत व्यक्त केले आहे.
साहाच्या खेळ भावनेवरच शंका घेतल्यामुळे तो दुखावला आहे. येत्या 6 जूनपासून झारखंडविरुद्धच्या रणजी उपांत्यपूर्व फेरीसाठी बंगालचा संघ जाहीर करण्यात आला, तेव्हा त्यात त्याच्या नावाचा समावेश नव्हता. म्हणून त्याने ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे साहा याच्या पत्नीने आपल्या ट्विटर हॅंडलवर पोस्ट केले आहे. साहा गेल्या 15 वर्षांपासून बंगालच्या संघाचा सदस्य आहे. त्याने बंगालकडून 122 प्रथम श्रेणी तसेच 102 लिस्ट-ए सामने खेळले आहेत.