पुणे – विरोधी पक्ष आपल्या आमदारांना त्या-त्या वेळी योग्य पदावर संधी देत नाही, अशी स्थिती कित्येकवेळा झाली आहे. त्यामुळे अन्याय होणाऱ्या अशा आमदारांना आम्हाला न्याय द्यावा लागतो, असे विधान करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांना विरोधी पक्ष निवडीवरून टोला लगावला आहे.
महाराष्ट्र विधानभवनात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानभवनात गुरूवारी (दि. 2) नवनिर्वाचीत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आले असता त्यांच्या स्वागत-अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्यानंतर, यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेता निवडीवरून कॉंग्रेसच्या धोरणावर टीका केली.
राज्यातील सत्ताकारण पुन्हा बदलल्याने विरोधी पक्षनेते पदावर कॉंग्रेसने दावा केला. मात्र, या पदावर कोणाची निवड होणार, यावर एकमत होत नव्हते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नागपूरचे आमदार ऍड. अभिजित वंजारी, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव समोर होते. नव्या चेहऱ्यास संधी दिली जाईल, असे सांगितले जात होते. परंतु, ऐनवेळी ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे नाव पक्षश्रेष्ठींसमोर केले गेल्याने त्यांच्या नावाची घोषणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच करण्यात आली.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्री पदी तसेच मंत्रीमंडळ विस्तारावेळी आमदार थोपटे यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदी त्यांचीच वर्णी लागेल, असे वाटत असताना ऐनवेळी वडेट्टीवार यांची निवड झाली.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉंग्रेसच्या धोरणावर टीका करीत विरोधी पक्ष आपल्या पक्षातील आमदारांवर अन्याय करीत आहे. तसेच, संग्राम यांच्यासारख्या अन्याय झालेल्या आमदारांना आम्हाला न्याय द्यावा लागत असल्याचे सूचक वक्तव्य केले, यावेळी फडणवीस यांनी कॉंग्रेसमधील आमदारांच्या संख्येबाबतही चिमटा काढला. त्यामुळे आगामी काळात आ. थोपटे हे भाजपात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली.
….अन् पुन्हा थोपटेंना डावलले
महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेते पद निवडीबाबत कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. यात बरेच मंथन झाले. नव्या चेहऱ्यास संधी देताना संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर होते. थोपटे यांच्या नावावर एकमतही झाले. परंतु, विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी हे पद भूषविले असले तरी त्यांना अनुभव असल्याने ऐनवेळी त्यांचे नाव पुढे आले. कॉंग्रेस श्रेष्ठींनी दि. 16 जुलैला विरोधी पक्षनेतेपदासाठी वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. वडेट्टीवार हे त्यावेळी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर होते. माजी आमदार वामनराव कासावर यांच्या निवासस्थानी चहा-नाष्टा करीत असतानाच अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या दिल्ली कार्यालयातून त्यांना विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याचे सांगण्यात आले तर दुसरा फोन थोपटे यांना आगामी काळात संधी दिली जाईल, असा होता.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नावाचा उल्लेख करीत कॉंग्रेसमधील आमदारांवर अन्याय होत असल्याचे म्हटले असले तरी न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या पक्षात जाण्याचा माझा सध्या तरी कोणताही विचार नाही. आगामी काळात पक्षाकडून योग्यपदी संधी मिळेलच. कॉंग्रेस पक्षाशी मी एकनिष्ठ आहे आणि यापुढेही राहील.”- संग्राम थोपटे, आमदार, भोर