मुंबई – केंद्रीय सत्ताधारी आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहेत हे आता कोणापासूनही लपलेले नाही. यातच भर म्हणून देशाच्या संसदेत विरोधकांना आंदोलन करण्यासाठी बंदी घातली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवून केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाहीविरोधात आपल्याला लढावेच लागेल, असे स्पष्ट केले.
पुणे दौऱ्यावर असताना सुप्रियाताईंनी माध्यमांशी संवाद साधला. संविधानातील अनुच्छेद 19 चा दाखला देत आपली बाजू मांडण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने देशात कुठेही आंदोलन करू शकतो, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध केला.
असा निर्णय जाहीर करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. आज खासदारांकडून हा अधिकार काढून घेतला जातोय, उद्या सामान्यांकडूनही हा अधिकार काढून घेतला जाईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून या निर्णयाविरोधात लढलेच पाहीजे. ही लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. संसदेत असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने अनेक वर्षे आंदोलने झाली आहेत. त्यामुळे देशावर ज्यांची सत्ता आहे त्यांच्या हुकुमशाही कट-कारस्थानाविरोधात आपल्याला लढावेच लागेल, असे आवाहन त्यांनी केले.