शहाजी देशमुख; खटाव कॉंग्रेस अध्यक्ष एकाकी, फौज आमदारांकडे
खटाव – आम्ही सर्वजण आ. जयकुमार गोरे यांच्या विचारांशी बांधील आहोत. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही आजपर्यंत वाटचाल केली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी ते एकाकी पडले आहेत. आम्ही सर्वजण आमदारांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत असे प्रतिपादन कुरोलीचे माजी सरपंच शहाजी देशमुख यांनी केले.
आ. जयकुमार गोरे यांनी आजपर्यंत मित्रपक्ष राष्ट्रवादीने कॉंग्रेसला नेहमीच खिंडीत गाठून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे सांगत माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पाठिंबा दिला आहे.
आ. गोरे यांच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण माढा मतदारसंघात उमटले. आमदारांसह कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीकडून खोट्या केसेस दाखल करण्यात आल्याचे, काहींची कुटुंबे उध्वस्त करण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगत हजारो कॉंग्रेसजनांनी राष्ट्रवादीला अद्दल घडविण्याचा निर्धार केला आहे. आ. जयकुमार गोरेंनी घेतलेला निर्णय डावलून खटाव कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी आघाडीसोबत जण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अध्यक्षांच्या गावचेच माजी सरपंच शहाजी देशमुख, उपसरपंच अमरजीत देशमुख , पंचायत समिती सदस्य हणमंतराव हिरवे, ग्रामपंचायत सदस्य वैभव गुरव, सनी बागल, रजनीश कांबळे, शिवाजी साठे, सर्जेराव फडतरे, कांतीलाल देशमुख, श्रीकांत देशमुख, संतोष भंडारे, सागर गुरव, चंद्रकांत हिरवे, तात्यासाहेब वलेकर, शहाजी हिरवे, कुमार पाटोळे, हरीदास बनसोडे, अमोल देशमुख, दिपक काळोखे, बापू सुतार, कैलास गुरव आणि असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठिशी रहाण्याचा निर्णय घेतला आहे.