नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाच राज्यांत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव आपने कॉंग्रेससमोर ठेवला आहे. मात्र, आप उत्सुक असला तरी कॉंग्रेस राजी होणार का ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीने जागावाटप निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सोमवारी कॉंग्रेस आणि आपमध्ये चर्चा झाली. ती अनिर्णित राहिल्याने चर्चेची आणखी एक फेरी होणार असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक फेरीतील चर्चेचा अधिक तपशील देण्यात आला नाही. मात्र, आपची सत्ता असणाऱ्या दिल्ली आणि पंजाबविषयी चर्चा झाल्याचे मानले गेले. पण, केवळ दोन नव्हे; तर पाच राज्यांत एकत्र लढण्याबाबत आप आग्रही असल्याचे त्या पक्षाचे नेते गोपाल राय यांनी मंगळवारी सूचित केले. आमच्यात चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, गोवा आणि गुजरातमध्ये एकत्रितपणे लढण्याची आपची भूमिका आहे. आतापर्यंतची चर्चा सकारात्मक ठरली आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दोन्ही पक्षांत विशिष्ट जागा लढवण्याविषयी अद्याप चर्चा झाली नाही. पुढील बैठकीत ती होईल, असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी नमूद केले.
आपशी दिल्ली आणि पंजाबमध्ये समझोता करण्याची चाचपणी कॉंग्रेस करत असल्याचे बोलले जात होते. आता आपने मांडलेला पाच राज्यांचा प्रस्ताव कॉंग्रेस स्वीकारणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.