संगमनेर -अचलपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार आमदार बच्चू कडू सलग तीन वेळा निवडून आले. या विधानसभा मतदारसंघातून मी स्वत: निवडणूक लढविणार आहे. या पडणाऱ्या जागा आम्ही मागत आहोत. या जागा आमच्यासाठी सोडल्यास तेथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय निश्चित नसून आघाडीला बळ मिळेल. आमच्या पक्षाला अमरावती जिल्ह्यातील दयार्पूर व अचलपूरसह राज्यातील आठ ते नऊ जागा हव्या आहेत. या गोष्टीला त्यांनी नकार दिल्यास विधानसभा निवडणुकीत आम्ही 50 जागांवर आमचे उमेदवार उभे करणार आहोत, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी दिला.
डॉ. गवई हे शनिवारी संगमनेरात आले होते. जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. गवई म्हणाले, अमरावती जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाची मोठी ताकद आहे. तसेच कांदिवली, घाटकोपर पूर्व, मुलुंड, मुर्तजापूर, वाशीम, देवळाली यांसह राज्यातील आठ ते नऊ जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्या पक्षासाठी सोडाव्यात. आघाडी सोबत जाण्याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदीं नेत्यांसोबत देखील सकारात्मक बोलणे झाल्याचे डॉ. गवई म्हणाले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) प्रदेश सरचिटणीसपदी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सुधाकर रोहोम यांची निवड करण्यात आली. तसेच त्यांना पक्षाची श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचेही डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले.प्रदेश समन्वयक प्रा. रमेश रूपवते, प्रवक्ते प्रा. बाळासाहेब वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख किशोर वाघमारे, सरचिटणीस सुखदेव भालेराव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कमल साळवे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र घायवट, उपाध्यक्ष उत्तम साळवे, प्रताप पवार, भाऊसाहेब गायकवाड, बन्सी घगाळे, गौतम रोहोम, यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.