मुंबई – महागाई, व्याजदर वाढ आणि युध्दामुळे शेअर बाजारात असलेली अस्थिरता आजही कायम राहिली. सकाळच्या सत्रामध्ये शेअर निर्देशांक बरेच वाढले होते. मात्र दुपारच्या सत्रात तेवढीच विक्री झाली आणि निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 37 अंकांनी कमी होऊन 54,288 अंकांवर बंद झाला.
विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 51 अंकांनी कमी होऊन 16,214 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे 1,390 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर 1,932 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. 158 कंपन्यांच्या शेअरच्या भावात चढ-उतार झाला नाही. वाहन क्षेत्राबरोबरच भांडवली वस्तू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक एक टक्क्यापर्यंत वाढले. मात्र केंद्र सरकारने पोलादावर निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे धातू क्षेत्राचा निर्देशांक आज आठ टक्क्यांनी कमी झाला.
त्याचबरोबर रिऍल्टी, औषधी, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राच्या निर्देशांकांत एक टक्क्यापर्यंत घट झाली. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप घसरले. एलकेपी सिक्युरिटीज या संस्थेचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी सांगितले की, पोलाद निर्यातीवर शुल्क लावल्यामुळे धातु क्षेत्राचे आज मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
केंद्र सरकारने इंधन आणि इतर काही बाबीवर वाढविलेल्या अनुदानामुळे सरकारचे तूट वाढण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत भारताच्या पतमानांकनावर परिणाम होऊ शकतो असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटते. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे महागाई आटोक्यात येण्यास मदत होणार आहे, मात्र त्यामध्ये विकासदराचा बळी जाण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत कंपन्यांचे नफे कमी होण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.