आळंदी – कार्तिकी यात्रेनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत येततात. इंद्रायणी नदीत स्नान करीत नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र सध्या नदीचे प्रदूषण वाढल्याने इंद्रायणी नदीत भाविकांच्या स्नानाची गैरसोय टाळण्यासाठी वडिवळे धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाईल, असे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी आळंदी समस्यांवर संवाद साधताना पत्रकारांना सांगितले.
आमदार मोहिते यांनी प्रदूषित इंद्रायणी नदीवरदेखील आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आता आळंदीसह खेडमधील भीमा- भामा नद्यांच्या परिसरात लोकवस्ती वाढल्याने नदी प्रदूषण वाढले आहे. यावर उपाय योजनेस प्रभावी पणे बारीक सारीक गोष्टींचा विचार करून नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा कोणी किती काहीही केले, तरी नद्यांचे प्रदूषण रोखणे अवघड होईल. सध्या सर्वत्र नद्यात थेट सांडपाणी सोडले जाते.
हे बंद होण्यासाठी नद्यांचे दुतर्फा गावांसह महापालिकेच्या हद्दीत ठिकठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुनर्वापर करण्यास देण्याची गरज आहे. नदीत थेट सांडपाणी जाणार नाही, याची दक्षता प्रथम घ्यावी लागेल असे ते म्हणाले.
नदीपात्राच्या दुतर्फ़ा रेड व ब्लू लाइनचा सध्या अनेकांना विसर पडला आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढली असून प्रशासनाकडून केवळ नोटीसा देण्यापलीकडे काही होत नाही. मनुष्यबळाचा अभाव असल्याने कारवाईचा बडगा उचलण्यास प्रशासन सक्षम नाही.
पीएमआरडीए स्थापन झाले. मात्र निधी आणि प्लॅनिंग तसेच कर्मचारी, अधिकारी न दिल्याने कामकाजावर मर्यादा असल्याचा संताप त्यांनी व्यक्त करत, प्रशासकीय यंत्रणेस पुरेशा प्रमाणात कर्मचारी नसल्याने विकास कसा साधणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.