नगर – पाण्याची मागणी व आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होवू नये, म्हणून महापालिकेने नगरकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करून नळास तोट्या बसविण्याबरोबरच नळास मोटारी लावून पाण्याचा उपसा करणाऱ्यावर कडक करवाई करण्याचा इशारा दिला आहे. दोन वेळा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पण तिसऱ्यावेळी मोटारीद्वारे पाणी उपसा करतांना आढळल्यास मोटार जप्त करून कायमस्वरूपी नळकनेक्शन बंद करण्याचा इशारा दिला आहे.
नगरकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची असून त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. परंतु काही नागरीक थेट नळास विद्युत मोटार लावून पाणी खेचतात. त्यामुळे परिसरातील नागरीकांना पाणी मिळत नाही. तसेच बहुतांशी नागरीकांच्या नळांना तोट्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी तोट्या न बसविणाऱ्यासह नळास मोटारी लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्यावेळी मोटारीद्वारे पाणी उपसा करतांना आढळून आल्यास मोटार जप्त करून एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. दुसऱ्यावेळेस मोटार जप्त करून दोन हजार रुपये दंड होईल.