माजी सैनिकांच्या पुढाकारातून आगडगाव घाटात पाणवठ्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
नगर -पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनतर्फे माळरानावर पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निसर्गप्रेमी माजी सैनिकांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, आगडगावच्या सदोबा व वाळूक टेंबा येथील वन विभागाच्या कोरड्या पाणवठ्यात टॅंकरद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात सर्वच नागरिक घरात आहेत. त्यात उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. उपलब्ध जलस्त्रोत आटण्यास सुरुवात झाली आहे. या परिस्थितीत पशु-पक्षी व प्राण्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी माजी सैनिकांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, संतोष मगर, तुकाराम मगर, बापू ससे, अनिल ससे, गौरव ससे, अभिषेक मगर, रोहित मगर, अमोल जावळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक संघटना डोंगर दऱ्यातील पाणवठ्यात पाणी सोडतात.
मात्र, लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यात कोल्हारच्या ससेवाडी डोंगरालगत अनेक पशु व प्राणी आहेत. उन्हाळ्यात त्यांची भटकंती थांबण्यासाठी व त्यांची तहान भागवण्यासाठी माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनने हा उपक्रम घेतला असल्याचे शिवाजी पालवे यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या घरच्या छतावर व गॅलरीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहनही फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरीच थांबण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.