नगर -जिल्ह्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात धान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 3 लाख 32 हजार 24 पात्र शिधापत्रिका असून त्यामधील 14 लाख 90 हजार 17 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
या लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य माहे मे व जून या 2 महिन्याच्या कालावधीसाठी वितरित करण्यात येणार आहे. दि. 31 डिसेंबर 2019 अखेर प्राप्त आकडेवारीनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपीएल (केसरी) लाभार्थ्यांना देय धान्याचा कोठा हा मे महिन्यासाठी असल्याने अशा पात्र लाभार्थ्यांनी एप्रिलमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराकडे गर्दी करु नये अथवा याबाबतच्या चौकशीसाठी स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधू नये. देय धान्याचा कोठा हा 1 मेपासून वितरीत करण्यात येणार आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी माहे एप्रिल ते जून या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमाह 5 किलो तांदुळ मोफत वितरीत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 6 लाख 75 हजार 527 एवढ्या पात्र शिधापत्रिकेमधील 30 लाख 19 हजार 277 एवढ्या सदस्यांना लाभ देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.