जवळार्जुन,(वार्ताहर) – जेजुरी औद्योगिक क्षेत्रासाठी वीर धरणावरून स्वतंत्र पाणी योजना असून या योजनेतून केवळ 40 टक्के पाणी उद्योगांना मिळते. त्यामुळे उद्योगक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आताच अनेक उद्योग टँकरने विकत पाणी घेत आहेत. त्यातच शासनाकडून या योजनेचे पाणी दुष्काळी भागांना देण्यासाठी मागणी होत आहे.
अशा निर्णयामुळे येथील कारखानदारी बंद होवू शकते. या योजनेतील एक थेंब पाणी देता येणे शक्य नाही. शासनाने दबाव आणल्यास उद्योजक व कामगार रस्त्यावर येवून आंदोलन करतील, असा इशारा जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे यांनी दिला आहे.
जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश खाडे,कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,सचिव राजेश पाटील,अनंत देशमुख व उद्योजकांनी पाणीटंचाई बाबत आपली भूमिका मांडली.
या बैठकीत 2003 ते 2006 या दुष्काळी काळात प्रचंड पाणीटंचाईमुळे जेजुरी औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग बंद पडले तर पाण्या अभावी येथील उद्योग इतरत्र गेले. उद्योजक संघाने पाठपुरावा केल्याने औद्योगिक महामंडळाने जेजुरी औद्योगिक क्षेत्रासाठी वीर धरणातून स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित केली.
या योजनेत विजेचा प्रश्न, फुटणार्या जलवाहिन्या व पूर्ण क्षमतेने ही योजना चालवली जात नसल्याने या योजनेतून केवळ 40 टक्के पाणीपुरवठा होतो. या उद्योग क्षेत्रात 180 उद्योग असून सुमारे 15 हजार कामगार येथे काम करीत आहेत.
पाणीटंचाई मानवनिर्मित
जेजुरी एमआयडीसीमधील कारखानदारीला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याने पिण्यासाठी वापरासाठी लागणार्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई झाली आहे. यामुळे अनेक उद्योग अडचणीत आले आहेत.
ही पाणीटंचाई मानव निर्मित आहे, औद्योगिक महामंडळ व शासनाने तातडीने दखल घेवून युद्ध पातळीवर या योजनेतून 100 टक्के पाणी पुरवठा करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली, असे डॉ. रामदास कुटे यांनी नमूद केले.
टंचाईला प्रशासन तेवढेच जवाबदार
पुरंदर तालुक्याला दुष्काळ नवीन नाही, प्रशासन व इतर यंत्रणा पाणी काटकसरीने वापरासाठी आणि टंचाईची पूर्व कल्पना असताना देखील कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय न केल्यामुळे या भीषण टंचाईला प्रशासन तेवढेच जवाबदार आहे असे उद्योजक संघाचे मत आहे.
जेजुरी एमआयडीसीला 70 टक्के कमी पाणीपुरवठा होतोय याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेवून पूर्ण क्षमतेने ही योजना सुरू करून उद्योग सुरळीत सुरू ठेवावेत, अशी मागणी उद्योजकांची असल्याचे डॉ. रामदा कुटे यांनी सांगितले. जेजुरी (ता. पुरंदर) : औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या बैठकीचे मान्यवरांनी मार्गदर्शन केले.