नगर -मुकुंदनगर भागातील मिलन कॉलनी, राजनगर, हीना पार्क, दर्गादायरा रोड येथील पाणी प्रश्नाची गंभिर समस्या आहे. ती मनपा प्रशासनाने लवकरात लवकर सोडविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष हबीब सलीम खान यांनी मनपा पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुकुंदनगर भागात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी पाण्याची लाईनही खराब झालेली आहे. त्यामधून लिकेज होत असल्याने, कमी दाबाने पाणी येते. तसेच स्वच्छताही नियमित होत नाही. त्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे, यावर मनपाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली.