सामाजिक संघटनेची पाहणी
44 ठिकाणी अधिक तर 20 ठिकाणी कमी प्रमाणात गळती
पिंपरी – शहरातील नागरिकांवर पुन्हा एकदा पाणी कपात लादण्यात आली आहे. अधिकारी आणि सत्ताधारी वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचा हिशोब सांगतात. परंतु पाणी गळती या विषयावर कोणीही बोलत नाही. एका सामाजिक संघटनेनेने केलेल्या पाहणीत 64 हून अधिक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाणी गळती होऊन रोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
शहरात जागोजागी व्हॉल्व्हमधून होत असलेली पाणी गळती. यामुळे शहरात दरोरोज लाखो लिटर पाणी वाया जाते. व्हॉल्व्ह सुरक्षा व दुरुस्ती देखभाल याकरिता महापालिकेकडे कोणतेही ठोस धोरण नाही व तसे नियोजनही केलेले दिसून येत नाही. दररोज पाण्याची होत असलेली नासाडी, जागोजागी उंच उडत असलेले पाण्याचे फवारे हे नित्याचेच होऊन बसले आहे.याकरीता एक स्वतंत्र दुरुस्ती पथक नेमण्याची आवश्यकता आहे.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने शहरात सर्वच उनगरात व प्रभागात पाहणी केली. त्यामध्ये शहरात 44 ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले.20 ठिकाणी मध्यम व कमी प्रमाणात पाणीगळती होत असल्याचे दिसून आले. मुख्यतः पाणी टाकीच्या जवळील असलेल्या प्रेशर व्हॉल्व्ह मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे दिसून आले.
पथकामध्ये सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश घाग,सतीश देशमुख,बळीराम शेवतें,संतोष चव्हाण,विजय मुनोत,अमोल कानु,बाबासाहेब घाळी,विशाल शेवाळे, नितीन मांडवे,जयेंद्र मकवाना,तुकाराम दहे,विजय जगताप,विभावरी इंगळे,अर्चना घाळी,अँड विद्या शिंदे यांनी काम पाहिले.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, व्हॉल्वच्या गळतीमुळे शहरात दरोरोज लाखो लिटर पाणी वाया जाते. शुद्ध जलासाठी व त्याच्या शुद्धीकरणासाठी पालिका दरोरोज करोडो रुपये खर्च करीत असते. नागरिकांच्या कररूपी पैशाची अश्या पद्धतीने नासाडी होणे योग्य नाही. जीवनावश्यक बाबीसाठी पालिकेने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आयुकांनी स्वतः लक्ष घालून तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.पालिकेकडे तज्ञ कर्मचारयांची कमतरता नाही त्यांना फक्त दिशा देण्याची आवश्यकता आहे.