पावसाची तूट : पालिका वाढवणार टॅंकरची संख्या
पुणे – श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पुणे मुक्कामी दरवर्षी असतात. त्यामुळे वारीच्या कालावधीत दोन दिवस 24 तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा धरणात असलेली पाण्याची कमतरतता तसेच दैनंदिन पाणी शहरालाच पुरत नसल्याने पालखीत 24 तास पाणी देण्याबाबत महापालिका प्रशासनच सांशक आहे. त्यामुळे वारी कालावधीत 24 तास पाणी देण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.
यंदा उन्हाळा तीव्र राहिला आहे. शिवाय, महापालिका हद्दीत नवीन गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी 30 ते 35 टक्क्यापर्यंत वाढली आहे. परिणामी, खडकवासला धरणसाखळीतून दिवसाला 1,200 ते 1,250 एमएलडीपर्यंत घेतले जाणारे पाणी आता 1600 एमएलडीपर्यंत वाढवले गेले आहे. तरीही, शहराच्या अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याने ओरड सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचे नियोजन कोलमडले आहे.
त्यातच आता खडकवासला धरणसाखळीत केवळ साडेतीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पाटबंधारे विभागाकडून खडकवासला धरणांच्या गेटच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे खडकवासला धरणाची पातळी खालावली असून परिणामी धायरी-खडकवासला भागाचा पाणी पुरवठा आधीच विस्कळीत झाला आहे. अशी स्थिती असतानाच आता शहरात पालखी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येणार आहे. या कालावधीतजवळपास 10 ते 12 लाख वारकरी येतात. त्यांना पाण्याची आवश्यकता भासते. प्रामुख्याने शहरातील नागरिकांच्या घरीही अनेक वारकरी तसेच दिंड्या मुक्कामी असतात. त्यामुळे महापालिका गेली काही वर्षे शहरात 24 तास पाणीपुरवठा ठेवत होती.
वारीसोबत पाठविणार 20 टॅंकर
महापालिका प्रशासन या दोन्ही पालखी सोहळ्यांसोबत पाण्याचे 20 टॅंकर पंढरपूरपर्यंत पाठवणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले असून, त्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, असे पावसकर म्हणाले. आळंदी आणि देहू पासून हे टॅंकर पंढरपूरपर्यंत असणार आहेत.
पालखी कालावधीत दैनंदिन वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ पाणी सोडण्यात येणार आहे. मुक्कामांच्या ठिकाणांसह दिंड्या ज्या शाळांत येतात, तेथे टॅंकरची व्यवस्था केली जाणार आहे. अनेक भागांत तत्पुरती नळकोंडाळी उभारली जातील. मात्र, 24 तास पाणी पुरवठा सुरू ठेवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख, मनपा