वडूज (प्रतिनिधी) – खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणामधील पाणी येरळा नदीत सोडल्याने बंधारे भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पैसे भरले; परंतु हे पाणी भुरकवडी, कुरोली भागात पोहोचण्यापूर्वीच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, धरणाच्या पाण्यावर ओलिताखाली येणाऱ्या भागातील सर्वांचा हक्क आहे. मग, कोणाच्या दबावाखाली पाणी बंद करण्यात आले, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून पाणी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नेर धरण पूर्ण भरले होते. धरणातील पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाने प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांचे अपेक्षित पाणी मागणी अर्ज आले नव्हते, तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी उपलब्ध करून दिले होते. एप्रिल-मेमधील पाणीटंचाई लक्षात घेऊन खटाव, कुरोली, भुरकवडी परिसरातील शेतकऱ्यांनी पैसे भरून येळा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी पैसे भरल्यावर नदीत पाणी सोडण्यात आले. खटाव, भुरकवडी, कुरोली परिसरात पाणी पोहोचले, पण बंधारे भरण्यापूर्वी पाणी अचानक बंद करण्यात आले. धरणात पुरेसा पाणीसाठा नाही, धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाणी ठेवावे लागणार असल्याची कारणे पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना काही रक्कम परत करण्यात आली. पैसे नको, पाणी द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. सहाशे हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या नेरचे पाणी शेवटच्या टोकावरील अनेक गावांना कधीच मिळत नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.