जामखेडमध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत
जामखेड – मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही कर्जत-जामखेडमध्ये कशासाठी महाजनादेश यात्रा घेऊन चालला आहात, कारण त्यांचं तर ठरला आहे. काय तुमचं ठरलंय ना! असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारताच उपस्थितांनी एक सुरात प्रा.राम शिंदे यांचे नाव घेतले. मी ही ठरवलयं की रामभाऊंना पुन्हा मंत्री करायचं. तुम्ही जितके जास्त मताधिक्य द्याल तितका मोठं खातं त्यांना दिले जाईल, असे सांगताच कार्यकर्त्यांनी टाळया वाजवत एकच जल्लोष केला.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जामखेड शहरात आल्यानंतर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी राऊत मळा येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, आ.सुरजितसिंह ठाकूर, आ.शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. स्नेहलता कोल्हे, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. भीमराव धोंडे, सुरेश धस, वैभव पिचड, दिलीप गांधी, भानुदास बेरड, बबनराव पाचपुते, अभय आगरकर, नामदेव राऊत, जामखेडचे सभापती सुभाष आव्हाड, नगराध्यक्ष निखील घायतडक, अमित चिंतामणी, डॉ. भगवान मुरूमकर, उपसभापती सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, अजिनाथ हजारे, डॉ. प्रवीण सानप, अमजद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
ना.फडणवीस म्हणाले, महाजनादेश भरभरून प्रतिसाद मिळत असताना विरोधकांच्या यात्रेला माणसं शोधावी लागत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीस हजार किलोमीटरचे रस्ते महाराष्ट्रात तयार करण्यात आले. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते बनवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचा दावा त्यांनी केला. एकट्या नगर जिल्ह्यात 1410 किमीचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आली. आपल्याकडे मी महाजनादेश मागण्यासाठी आलो आहे. देणार की नाही असे मुख्यमंत्र्यांनी विचारताच खालून होय मिळणार असे उत्तर मिळाले. आपल्या पाठबळावर पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांना महाराष्ट्राच्या विधानसभेवर भाजप महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ना. मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामामुळे सर्वसामान्यांपर्यंत विकास पोचला असल्याचे मत व्यक्त केले. ना. शिंदे यांनी कर्जत जामखेडला झालेल्या विकासकामांची माहिती दिली. निधीसाठी या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुकते माप दिल्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले. या दोन्ही तालुक्यातील दुष्काळ निवारण आगामी काळात नक्कीच केले जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री निधीची कमतरता पडू देणार नसल्याचा विश्वास ना. शिंदे यांनी व्यक्त केला.
जामखेडच्या पाणीपुरवठा
योजनेचे मंजुरी पत्र सुपूर्द
जामखेड शहरासाठी 117 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्याला शासनाची मंजुरी मिळाली असून मंजूरी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरच प्रा. राम शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.