श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील माळवाडगाव ग्रामपंचायतच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा विहिरीवरील पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीचा पाईप अज्ञात शेतकऱ्याने फोडून शेतातील पिकास पाणी देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उपसरपंच शाम आसने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत उपसरपंच आसने यांनी श्रीरामपूर पंचायत समितीचे सहायक अभियंता यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.
माळवाडगाव ग्रामपंचायतीच्या मागील सत्ताधाऱ्यांनी मुठेवाडगाव पाझर तलाव नजीक जागा घेऊन 1 कोटी ७५ लाख रुपयांची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने राबविली होती. त्यांनतर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर होऊन डॉ. नितीन आसने यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सत्ता मिळाली.
त्यांना जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी ही योजना हस्तांतरित करण्यास विरोध केला. या योजनेच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद विभागाकडे केली. गेली चार महिन्यांपासून ही योजना ठप्प आहे.उपसरपंच शाम आसने आपल्या सहकाऱ्यांसमवेत या योजनेची पाहणी करण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना या विहिरीवर दोनपैकी एक विद्युतपंप ग्रामपंचायतच्या रोहित्रमधून सुरू असल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे या रोहित्रावर रिडिंग मिटर बसविलेले आहे. अज्ञात शेतकरी या पाणीपुरवठा योजना विहिरीतून रोहित्रामधून शेतीसाठी पाण्याचा गैरवापर करत आहे. उपसरपंच शाम आसने यांनी श्रीरामपूर पंचायत समितीचे सहायक अभियंता पिसे यांच्याकडे तक्रार करून या प्रकाराची शासन स्तरावर चौकशीची मागणी केली.
माजी सरपंच डॉ. नितीन आसने म्हणाले की,जलजीवन योजनेच्या पाण्याचा अद्याप गावाला फायदा झालेला नाही. मात्र, या विहिरीतील पाण्याचा व रोहित्राचा कुणी शेतकरी गैरवापर करत असेल तर हे चुकीचे आहे. वीजबिलाचा भुर्दंड ग्रामपंचायतीला बसणार आहे.आम्ही रितसर तक्रार केली आहे. या पाहणीप्रसंगी उपसरपंच शाम आसने, प्रमोद आसने, सुधीर शेळके, महेश मोदी, केशव आसने आदी उपस्थित होते.