श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- बेलापूर ग्रामपंचायतीच्या जागेत केलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढल्यानंतर चुकीचा संदेश पसरविण्यात आल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी संबंधित जागेत बांधलेले तार कंपाऊड तोडून पुन्हा तेथे जनावरे बांधल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पुन्हा ती अतिक्रमण केलेली जागा मोकळी करून देऊन या वादावर पडदा पाडला.
बेलापूर बाजार तळाजवळ असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अतिक्रमण करून जनावरे बांधण्यात आली होती. तेथे शेड बांधण्यात येणार असल्याचे समजताच बेलापूर ग्रामपंचायतीने ते सर्व सामान कार्यालयात आणले. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात ते अतिक्रमण काढून टाकले.
बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने त्या जागेस तार कंपाऊड करण्यात आले. ही बाब काहींना खटकली. त्यांनी अपप्रचार करून गो शाळेतून गायी बाहेर काढल्या, असा संदेश पसरविला. त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा झाले. चुकीच्या माहितीमुळे आलेल्या कार्यकर्त्यांनी बेलापूर ग्रामपंचायतीने केलेल्या कंपाउडची तोडफोड केली.
तसेच त्या जागेत पुन्हा जबरदस्तीने जनावरे बांधली. ही बाब ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला आणले. जि प सदस्य शरद नवले, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक, सुनिल मुथा, प्रफुल्ल डावरे, देविदास देसाई आदींसह सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमा झाले.
ग्रामस्थ, पदाधिकारी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यामध्ये बराच वेळ जोरदार बाचाबाची झाली. यावेळी जि.प. सदस्य शरद नवले, सुनिल मुथा यांनी सांगितले की, ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करून चुकीचा संदेश पसरवून गावातील वातावरण कुणी खराब करत असेल तर ते कदापीही खपवून घेणार नाही. त्यामुळे कंपाउडची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
त्याचवेळी श्रीरामपूरहून आलेल्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली की, अतिक्रमण काढू नये, याकरिता गो शाळेतून गायी काढून दिल्याचा चुकीचा संदेश देऊन बोलविण्यात आले. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यानीही थोडेसे नमते घेतले. ताबडतोब पुन्हा ग्रामपंचायतीची जागा मोकळी करून द्यावी नाहीतर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम भूमिका सुनिल मुथा, सरपंच स्वाती अमोलिक, जि.प. सदस्य शरद नवले, अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे यांनी घेतली.
अखेर पुन्हा अतिक्रमण केलेली जागा मोकळी करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यावर आपापसात एकमत झाले अन् त्या वादावर पडदा पडला. तोपर्यंत गावात काहीतरी वेगळेच घडल्याची चर्चा तालुकाभर पसरली होती, परंतु पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपनिरीक्षक दीपक मेढे , सुधीर हापसे, बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनर, नंदु लोखंडे, होमगार्ड अजय भागवत यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली .