पिंपरी, (प्रतिनिधी) – उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरवासियांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. चिखली, मोशी, डुडुळगाव, च-होली, भोसरी, दिघी भागात पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नळाला कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच असे चित्र असल्याने मे महिन्यात यापेक्षा भयानक परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येणार की काय ? अशी चिंता नागरिक व्यक्त करु लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून ५१० एमएलडी पाणी दररोज उचलले जाते. तरीही, चिखली, मोशी, च-होली, डुडुळगाव, भोसरी, दिघी भागात पाण्याची समस्या कायम राहिली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने आंद्रा धरणातून १०० एमएलडी मंजूर पाणी कोटा उपलब्ध करुन या भागात पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी इंद्रायणी नदीपात्रातील निघोजे बंधा-यातून सुरुवातीला ५० एमएलडी पाणी उलचण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यामध्ये २५ एमएलडीने वाढ करण्यात आली. ७५ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुध्दीकरण केंद्रात साठवून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर या भागाला वितरित करण्यास सुरुवात केली.
मात्र, मागील काही दिवसांपासून आंद्रा धरणातून इंद्रायणी पात्रात सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले आहे. सध्या उपसा करण्यात येणा-या पाण्यात ३० ते ३५ एमएलडी तुट जाणवत आहे. त्यामुळे उलचण्यात येणारे ४० ते ४५ एमएलडी पाणी चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करुन वितरित केले जात आहे.
हे पाणी अपुरे व कमी दाबाने सोडले जात असल्यामुळे चिखली, मोशी, च-होली, डुडुळगाव, भोसरी, दिघी भागात तक्रारी वाढल्या आहेत. उन्हाळा सुरु होत असताना पाणी पुरवठ्याची अशी स्थिती असेल तर मे महिन्यात गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याने नागरिकांनी याचा धसका घेतला आहे.
तोडगा काढण्यासाठी संवाद साधणार
आंद्रा धरणातून पाणी कमी येत असल्याने याबाबत महापालिकेने जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधला आहे. ठरलेल्या काेट्यानुसार पाणी साेडण्यात येत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पाणी कमी केले असेल तर त्यासंदर्भात कळवले जात नसल्यामुळे समस्येवर मार्ग काढणे कठीण झाले आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्त आणि इरिगेशन खात्यातील अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली जाईल. त्यानंतर ते पुरेसे पाणी सोडतील अशी अपेक्षा मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी व्यक्त केली आहे.
सध्या निघोजे बंधा-यातून ४० एमएलडी पाणी उचलण्यात येते. पाणी कोट्यात ३० ते ३५ टक्के तूट जाणवत आहे. सध्या काही प्रमाणात नागरिकांच्या समस्या आहेत. निघोजे बंधारा लिकेज असल्यामुळे त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात मातीचा बंधारा तयार करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे शहरासाठी अपेक्षित पाणी उपलब्ध होईल. भविष्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही.- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग