पिंपरी – मार्च महिन्यात दिवसाआड पाणीकपात रद्द करून पाणीपुरवठा नियमित करण्याचे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे पाणीसंकट सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सव्वा चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याबाबत तब्बल 1 हजार 344 तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. यामुळे शहराच्या विविध भागात पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या सव्वा चार महिन्यात आठही क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत पाणी कमी दाबाने येणे, पाइपलाइन फुटणे, पाणीच न येणे अशा विविध प्रकारच्या 1 हजार 344 तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत.
शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. महापालिका पवना नदीवरील रावेत येथील बंधाऱ्यावरून वीस पंपाद्वारे पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. परंतु शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सहा टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या आसपास आहे. महापालिका दिवसाला सुमारे 510 एमएलडी पाणी उचलते. त्यापैकी 38 ते 40 टक्के तूट आहे. त्यात अपुरा, अनियमित व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची भर पडली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अपुरा, अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबाबत शहरातील नागरिकांच्या तक्रारारी दिवसेंदिवस वाढत आहेत.
पवना नदीवरील रावेत बंधारा येथून सध्या महापालिका 510 एमएलडी पाणी उचलते. दररोज 30 ते 35 दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून विकत घेते. म्हणजेच दररोज 545 दशलक्ष लिटर पाणी शहरासाठी वापरले जाते. मात्र, वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी यामुळे पाणी कमी पडत असल्याचे चित्र आहे. शहराची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भामा आसखेड व आंद्रा धरणातून 268 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा राज्य सरकारकडून काही वर्षांपूर्वीच मंजूर आहे. त्यासाठी तीनशे दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र चिखली येथे उभारण्यात येत आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत घटला पाणीसाठा
शहर व मावळ परिसराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात सद्यस्थितीत 58.65 टक्के पाणीसाठा आहे. 2021 मध्ये धरणात आजअखेर 64.94 टक्के पाणीसाठा होता. सद्यस्थितीत गतवर्षांपेक्षा 6 टक्के पाणीसाठा कमी आहे. तर उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरात पाण्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.