खटाव – खटाव तालुक्यातील खातगुण गावचे सुपुत्र विवेक लावंड यांचा महाराष्ट्र उद्योग रत्न या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. नाशिक येथे एका कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार विवेक लावंड यांना प्रदान करण्यात आला.
करोनासारख्या महामारीच्या काळात व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करून केवळ ग्राहकांना उत्तम सेवा न देता गरजूंना रोजगार मिळवून दिल्याबद्दल लावंड यांना महाराष्ट उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
सदर पुरस्कार प्रदान सोहळ्यात भारत एटीएम व रिसेल यांच्या सयुक्त विद्यमाने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यभरातील 14 व्यक्ती व संस्थांना मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. खातगुण सारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेले विवेक लावंड यांनी शासनाची कोणतीही योजना किंवा बॅंकेची मदत न घेता केवळ एका वर्षात संघर्ष, मेहनत व जिद्दीच्या बळावर वीरा इंडस्ट्रीजच्या माध्यमातून तीन कोटींची उलाढाल केली.
प्रतिकूल काळात व अल्पावधीत मारलेल्या भरारीची दखल घेऊन वन ऑफ द बेस्ट मल्टीटास्कींक कंपनी म्हणून त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार रिसेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर कुमार, भारत एटीएमचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम सर व नाशिक महानगर पालिकेचे मुख्य अधिकारी दत्तात्रय तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेक लावंड यांना देण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात लावंड यांनी समईवात, कापूर, पेपर द्रोण, अगरबत्ती, फुलवात, सांभरणी धूप कप, युज ऍण्ड थ्रो पेन मशीन, वेलव्हेट पेन्सिल मशीन, फॅन्सी बटन निर्मितीसारखे गृहउद्योग सुरू केले. या काळात अनेकांचा रोजगार बंद झाला होता. त्यावेळी लावंड यांनी गरजूंना हाताशी घेऊन या व्यवासायाशी संबधित कच्चा माल देऊन त्यांच्याकडून तयार झालेला माल योग्य मोबदल्यात घेऊन बाजारपेठेत विक्री केली. याद्वारे कंपनीने अत्यंत प्रतिकूल काळात उत्तम पध्दतीने केलेल्या व्यवसायाची दखल घेत गौरवण्यात आल्याची माहिती लावंड यांनी दिली.