पिंपरी – सत्ताधारी भाजप व ढिसाळ प्रशासनामुळे पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा समस्या कायम आहे. पावसाच्या पाण्यामुळे विविध परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाच्या संगनमतामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या तातडीने मार्गी लावावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा समाजवादी पक्षाने दिला आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कचरा गोळा करून तो मोशी येथील कचरा डेपोपर्यंत वाहतूक करून डंपींग करण्याचे काम बी.व्ही.जी. इंडिया आणि ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्टस यांना देण्यात आले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये कामाला मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात काम 4 महिने विलंबाने 1 जुलैपासून सुरू झाले. वाढीव दराने तब्बल 8 वर्षे कालावधीसाठी ठेका मंजूर करुन सत्ताधाऱ्यांनी टक्केवारीचा खेळ केल्याचा आरोप कुरेशी यांनी केला आहे.
ठेकेदारांनी स्वत:ची 100 टक्के वाहने खरेदी करून कचरा संकलनाचे काम करण्याचे निविदा अटीत नमूद आहे. मात्र, अद्याप ठेकेदारांची 100 टक्के सर्व वाहने रस्त्यावर आलेली नाहीत. तसेच, घंटागाडीवरील एक कामगार कमी केला आहे. या कारणांमुळे शहरातील काही भागांतील दररोजचा कचरा उचलला जात नसल्याने चित्र आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार बाजूला सारुन शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे निवेदनात नमूद आहे.