आळंदी वडगाव चौकात अपघात ः वाहनचालक ताब्यात
आळंदी – येथील मुख्य वर्दळीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावरील भैरवनाथ चौकात अवजड वाहनाने ठोकरल्याने वारकरी भाविक जखमी झाला. यामुळे आळंदीतील सुरक्षित रहदारी आणि भाविकांची अनवाणी पायाने होणारी प्रदक्षिणा धोकादायक झाली आहे, यामुळे आळंदीचा प्रलंबित राहिलेला वाहतूक नियंत्रण विकास आराखडा तयार करण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.
येथील भैरवनाथ चौकातून जात असताना अवजड वाहन (एचआर 38 डब्ल्यू 7296) या वाहनाने पादचारी वारकऱ्यास या वाहनाचा धक्का लागल्याने झालेल्या अपघातात वारकरी भाविक जखमी झाला. जखमी भाविक वारकऱ्यास उपचारास रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यातील वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर तात्काळ पोलिसांनी वाहतूक नियंत्रित केली.
आळंदी शहरातील सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी पोलीस प्रशासन, आळंदी नगरपरिषद, व्यापारी स्थानिक नागरिक यांच्या सुसंवादातून वाहतूक नियंत्रण विकास आराखड्याला गती देण्याची गरज यावेळी अनेकांनी व्यक्त केली. आळंदी नगरपरिषदेने विविध चौकांत वाहतूक नियंत्रक पथदिवे विकसित करण्यास निविदा प्रक्रिया राबविली. मात्र या प्रक्रियेला विलंब झाल्याने विकास साधता आला नाही. देहू फाटा चौक, चाकण चौक, नगरपरिषद चौक, भैरवनाथ चौक, मरकळ रस्ता चौक, वाय जंक्शन आदी ठिकाणी वाहतूक नियंत्रक सिग्नल विकसित करण्याची गरज वाढत्या वाहतूक कोंडीने
वाढली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
आळंदीत कायम वाहतूक कोंडी होत असते. यातून येथील प्रमुख चौकात उभ्या राहणाऱ्या गाड्यामुळे रहदारीला अडथळा होत आहेत. नगरपरिषद आणि भैरवनाथ चौकात वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने भाविक आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. नगरप्रदक्षिणा मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी आहे. या मार्गावर तसेच उपलब्ध रस्त्याच्या रुंदीचा विचार करून वाहन पार्किंग पी 1, आणि पी 2 सम-विषम तारखेप्रमाणे करण्यास मान्यता आणि यासाठी जनजागृतीचे फलक लावण्याची आवश्यता आहे.
-दिनेश घुले, माजी नगरसेवक, आळंदी