25 वर्षानंतर होणार होती निवडणूक : विद्यापीठ, महाविद्यालयीन निवडणुकीचा कालावधी संपला
पिंपरी(प्रतिनिधी) – तब्बल 25 वर्षांनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. परंतु राज्य आणि केंद्राच्या राजकारणात विद्यार्थी राजकारण दबून गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, नंतर सत्ता स्थापनेचा घोळ यात पुढे-पुढे ढकलत गेलेल्या विद्यार्थी निवडणुकांचा अखेर कालावधी संपून गेला आणि 25 वर्षांनंतर आलेला मुहूर्तही हुकला. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. आता डिसेंबर महिन्याचा संपत आला आहे तरी या निवडणुकीची कोणतीही घोषणा झाली नाही तसेच निवडणुकीची डेडलाईनही संपल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
राज्य शासनातर्फे तयार करण्यात आलेल्या नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये 25 वर्षानंतर खुल्या पद्धतीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीमूळे महाविद्यालयीन निवडणुकीला स्थगिती दिली होती. दरम्यान, विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर नवे सरकार स्थापन होण्यास विलंब लागला. त्यामुळे, विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या नाहीत.
विद्यापीठ कायद्यातंर्गत डिसेंबर महिन्यापर्यंतच निवडणुका घेण्याचा कालावधी ठरविण्यात आला होता. त्यामुळे आता या शैक्षणिक वर्षात तरी महाविद्यालयीन निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्वाचे धडे शिकण्याची संधी मिळणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी काळात तरी या निवडणुका व्हाव्यात अशी, मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
निर्देश नसल्याचे महाविद्यालयांकडून स्पष्टीकरण
विद्यार्थी परिषद निवडणूक या वर्षापासून सुरु करण्याचे शासनाने निर्देशित केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. अजूनतरी शासनस्तरावरुन कोणतेही निर्देश मिळाले नसल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे, यावर्षी होणाऱ्या महाविद्यालयातील निवडणुका टळल्या आहेत.
महाविद्यालयीन निवडणुकीच्या माध्यमातूनच देशाला व राज्याला नेतृत्व मिळाले आहे. अशा निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व, संघटन कौशल्य, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती तसेच प्रतिनिधित्वाचे प्रशिक्षण मिळू शकेल. मात्र, गैरप्रकाराच्या भितीने निवडणुका टाळणे म्हणजे अक्षमता दाखवण्यासारखेच आहे.
– प्रा. जनार्दन क्षीरसागर, पिंपरी
यावर्षी महाविद्यालयात निवडणुका होणार असल्यामुळे आम्ही संपूर्ण तयारी केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयातील निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता डिसेंबर महिन्यात तरी निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदा या निवडणूक होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. आता पुढील वर्षी तरी निवडणुका वेळेत घ्यावेत, अशी आमची मागणी आहे.
– ओंकार जाधव, विद्यार्थी