पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. त्यावेळी पुरेसे पाणी नसतानाही शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळत होते. यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना सुद्धा पाणीकपात सुरु आहे. त्याचे कारण काय? याचा अर्थ नियोजन कुठे तरी कमी पडत आहे. नेमका नियोजनाचा कुठे अभाव आहे? असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
खासदार डॉ. कोल्हे यांनी शनिवारी शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा केली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने उपस्थित होते. पाणी, स्मार्ट सिटी, वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पांचा त्यांनी या वेळी आढावा घेतला.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, स्मार्ट सिटीच्या कामाची माहिती घेणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात ऑप्टिकल फायबरचे काम सुरु आहे. काम सुरु असताना खोदाई केलेले खड्डे व्यवस्थित बुजले नाहीत. बाजूला मुरुम टाकला आहे. स्मार्ट सिटीचे स्मार्टली काम कशासाठी होतेय? याचा लेखाजोखा घेणार आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची सखोल माहिती प्रशासनाकडून मागविली होती. हा प्रकल्प सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित होईल असे सांगण्यात आले होते. त्याची सविस्तर माहिती घेणार आहे. तसेच ई-लर्निग, ई-स्कूल या प्रश्नांची सखोल माहिती घेणार असल्याचेही सांगून पालिकेतील सत्ताधाऱ्यांना खासदारांनी सूचक इशाराही दिला आहे.
खासदार वेळ पाळत नाहीत…
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रलंबित प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी शहरात आले होते. यापूर्वी एकदा त्यांनी शहराचा आढावा घेतला होता. मात्र खासदारांकडून एकदाही वेळ पाळली जात नाही. त्याचा त्रास सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांना सहन करावा लागतो. शनिवारी सायंकाळी पाच वाजत खासदार कोल्हे पत्रकारांशी संवाद साधणार होते. त्यापूर्वी ते आयुक्त श्रावण हर्डीकर व प्रशासान अधिकाऱ्यांसोबत निगडी येथे बैठक घेणार होते. मात्र कोल्हेनी पत्रकारांना दिलेल्या वेळेच्या तब्बल दोन तास उशीर केला. सायंकाळी सात वाजता ते निगडी येथील मनपा जलशुद्धीकरण केंद्रात आले. तोपर्यंत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह प्रशासन अधिकारी आपले सर्व काम सोडून त्यांच्या रस्त्याकडे डोळे लावून बसले होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची फोनाफोनी सुरू होती.