वारजे – वारजे-एनडीए या मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून चाळण झालेली पाहायला मिळते. या जीवघेण्या समस्येला नागरिक मात्र पुरते वैतागले आहेत.
वारजे-एनडीए हा रस्ता खडकवासला धरण क्षेत्राकडेही जातो. त्यामुळे या मार्गावर वाहतूक प्रचंड असते. शिवाय, जड वाहनांचादेखील मुक्त वावर असतो.
रस्त्यालगत छोटे-मोठे विक्रेतेही असतात. पीएमपीदेखील याच रस्त्याने धावतात. त्यातच रिक्षाचालक, फळ विक्रेते इतर पथारी व्यावसायिक याच रस्त्यालगत ठाण मांडून असतात. हा मुख्य रस्ता असल्याने इथे सदैव वर्दळ असते. पण, खड्डे आणि पावसामुळे डबकी साचल्याने लोकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने हे खड्डे किती खोल आहे, याचा अंदाज येत नाही. एकामागून एक जोरदार जाणारी वाहने यांना अंदाज न आल्याने या रस्तावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
तसेच एनडीएकडून वारजेकडे येताना उतार लागतो. यामुळे वाहनांचा वेग नकळतच वाढतो. खड्डयांमुळे लोक अचानक ब्रेक लावतात आणि मागून येणाऱ्या वाहणारा समोरील वाहनाचा अंदाज येत नाही आणि अपघात होतात. या सगळ्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.