खालापूर – संतांनी दिलेला अध्यात्मिक वारसा कोकणात आजही मजबूत आहे. येत्या शुक्रवारी आणि शनिवारी आळंदी येथे माऊलीच्या समाधी दिना निमित्ताने समस्त वैष्णवांचा मेळावा भरणार आहे. प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी यात कोकणातील वारकरीही मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.
खालापूर तालुका सहित संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वारकरी मागील दोन तीन दिवसांपासून खोपोलीला मुक्काम करुन माऊलीच्या गावाला निघत आहेत. खोपोली मुक्कमी आलेल्या सर्वच वारकरी दिंड्याचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. वारकरींच्या आदरतीर्थ्यासाठी खोपोली नगरपालिका, पोलीस प्रशासनासह विविध राजकीय, सामाजीक संस्था, मंडळे आनंदाने झटत आहेत.
माउलीच्या गावी जावून मनोभावे भक्ती व दर्शन घेण्यासाठी रायगड मधील दीडशेच्यावर पायी दिंड्या व हजारो वैष्णवांनी खोपोलीला मुक्काम करुन आळंदीच्या दिशेने हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण सुरु केले आहे. यात खालापूर तालुक्यातील प्रमुख दिंड्यांच्या माध्यमातून दहा हजाराच्यावर वारकरी समाविष्ठ आहेत. खोपोली नगरपरिषदेच्या वतीने शिळफाटा येथे वारकरी दिंड्यांचे मनोभावे स्वागत करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे संचलित भैरवी शिक्षण विकास संस्था मुळगांव व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगराध्यक्ष मसुरकर, डॉ सुनिल पाटील, माजी अमोल जाधव यांच्या सह सर्व माजी नगरसेवक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून दिड्यांचे मनोभावे स्वागत केले जात आहे. उद्दोजक यशवंत साबळे यांचे महाराजा मंगलकार्यालय, वरची खोपोली भगवान वीरेश्वर देवस्थान मित्र मंडळ, वासरंग, लौजी, चिंचवली येथील वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, खोपोली व्यापारी असोशीयशन, माजी नगरसेवक महादू जाधव यांच्या पुढाकारने भानवज येथील शंकर मंदिर देवस्थान कमिटी, गगनगिरी मित्र मंडळ इत्यादींच्या पुढाकाराने समस्त वारकरयांना चहा नाश्ता, खाण्यापिण्याची, मुक्कामाची व आवश्यक सुविधासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
या दोन-तीन दिवसांत खोपोलीला मुक्काम घेऊन एक–एक दिंडी हरिनामाचा गजर करीत “अवघा संसार, करावा सुखाचा” हा संदेश देत घाट माथ्यावरून माउलीच्या समाधीच्या दर्शनासाठी वाटचाल करीत आहेत. मागील तीन दिवस खोपोलीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर, खोपोली शहरात सर्वत्र वारकरी संप्रदायाची भगवी पताका, टाळ मुर्दुगाच्या ठेक्यावर हरिनामाचा गजर व तुकोबा, न्यानबा माउलीचा जयजयकाराचे अत्यंत उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.